CrimeDetection

बुवाबाजीने हेरले.. चाळीसगावात बोलावले.. जंगलात डांबले.. एलसीबीने सोडवले

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एकाचे काही तरुणांनी अपहरण केले. ओळखीचा फायदा घेत त्याला बोलवून बुवाबाजीच्या गोंधळातून नाशिक जिल्ह्यात जंगलात त्याला डांबले. सिनेस्टाईल मारहाण करून तोंडाला पट्टी बांधत अपहृत व्यक्तीच्या मोबाईलवरून व्हिडिओ घरी पाठवला. व्हिडिओ पाहून कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली आणि पोलीस कामाला लागले. एक-एक साखळी जोडत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अपहृत व्यक्तीची सुटका केली. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

चाळीसगाव तालुक्यातील वाघले अनिल गणेश राठोड यांचे वडील गणेश ताराचंद राठोड वय-४२ रा.वाघले यांचे दि.३० मे रोजी अनोळखी लोकांनी अपहरण केले असुन त्याचे सुटकेसाठी ४५ लाख रुपयेची खंडणी मागत असल्याची फिर्याद दिली होती. फिर्याद वरुन चाळीसगांव ग्रामीण पोस्टे येथे गु.र.नं १३७/२०२५ भा.न्या.संहीता कलम १४०(२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधिक्षकांनी दिल्या सूचना
आरोपी हे अपहरण केलेल्या व्यक्तीस मारहाण करतानाचे व्हीडीओ टाकुन तसेच व्हाईस कॉल करुन पैसे तात्काळ देण्याची धमकी देत होते. यातील अपहरण केलला इसम याचे नक्की कोठुन अपहरण झाले आहे याबाबत काहीही पुरावा मिळुन येत नव्हता. सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहुन तो उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानीक गुन्हे शाखा पथकास सुचित केले होते.

पोलिसांनी केला सिनेस्टाईल पाठलाग
गुन्हयाच्या समांतर तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडुन नेमण्यात आलेल्या पथकाने तांत्रीक विश्लेषण व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी जयेश दत्तात्रय शिंदे, वय-२८ रा.सैनिक कॉलनी चाळीसगांव, श्रावण पुंडलिक भागोरे, रा.स्वामी विवेकानंद कॉलनी, नांदगाव जि.नाशिक यांची नावे निष्पन्न केली. त्यांचे ठावठिकाणाबाबत माहीती घेतली असता ते मौजे मोझर्ण ता.नांदगाव परिसरात असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. पथकाकडुन त्यांचा शोध घेत असताना आरोपी हे मनमाड रेल्वेस्टेशनकडे मोटार सायकलवरुन जात असल्याची माहीती मिळाली. आरोपींच्या मोटार सायकलचा पाठलाग करत असताना पोलीस गाडी पाहुन आरोपी हे मोटार सायकल रस्त्यावर सोडुन रस्त्यालगतच्या शेतामधुन पळुन जाता दिसले. आरोपी यांचा सुमारे ५ किलोमिटर पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले.

४५ लाखांची मागितली खंडणी
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, आमचे मित्र जनार्दन बाळु आवारे उर्फ राजु पाटील रा शिंदी ता चाळीसगांव ह.मु.डोंबीवली जि. ठाणे व त्याचा मित्र सोनु भाऊ पुर्ण नाव माहित नाही, रा.मुंबई यांच्या सांगण्यावरुन आम्ही गणेश ताराचंद राठोड यांचे अपहरण केले होते व त्यांना मारहाण करुन त्यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ त्यांच्याच मोबाईलफोनवरुन त्यांचा मुलगा अनिल गणेश राठोड याला पाठवित होतो व गणेश ताराचंद राठोड याला सोडण्यासाठी त्याच्या मुलाकडे ४५ लाख रुपयांची खंडणी मागीतली होती. अपहरण केलेल्या गणेश ताराचंद राठोड यांना चाळीसगांव तालुक्यातील पाटणा गावाचे परिसरात एका शेतातील शेड मध्ये डांबुन ठेवुन त्यांस मारहाण केली अशी हकिगत आरोपी यांनी सांगीतली.

लासूरच्या जंगलातून केली सुटका
सदर गुन्हयातील आरोपी यांनी अपहरण केलेल्या पिडीत व्यक्तीला विंचुर, लासलगाव येथील जंगलात सोडुन देवुन उर्वरित दोन आरोपी हे तेथुन फरार झाले. त्यांना पथकाने सदर पिडीत व्यक्तीचा लासलगांव जंगलामध्ये शोध घेतला असता जखमी अवस्थेत पिडीत गणेश ताराचंद राठोड हे मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन दोन आरोपींसह त्यांना चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.

या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउपनि शेखर डोमोळे, पोह संदीप पाटील, पोह मुरलीधर धनगर, पोकॉ महेश पाटील, पोकॉ सागर पाटील, पोकॉ भुषण शेलार, पोकॉ ईश्वर पाटील, पोकॉ भुषण पाटील, पोकॉ जितेंद्र पाटील, चापोह दिपक चौधरी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा अशांनी केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button