
आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : सर्व रजा रद्द, अधिकारी-कर्मचाऱ्यांना तत्काळ हजर राहण्याचे आदेश
जळगाव | प्रतिनिधी जिल्ह्यात निर्माण होऊ शकणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व रजा रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय सर्वांना तात्काळ आपल्या सेवास्थळी हजर राहण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत हा आदेश कलम 30(2)(iv), 30(2)(xvi) व 34(a) अन्वये देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असल्याने, त्यांनी या अधिकाराचा वापर करत दिनांक 9 मे 2025 पासून पुढील आदेशापर्यंत सर्व पूर्वमंजूर रजा रद्द केल्या आहेत.
सध्या रजेवर असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ हजर राहावे, तसेच कोणताही कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगीशिवाय रजेवर जाणार नाही किंवा मुख्यालय सोडणार नाही, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे.
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी संबंधित विभागप्रमुखांनी करावी, तसेच अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा इशाराही यामध्ये देण्यात आला आहे.