Other

विद्यापीठात ‘स्टार्टअप संवाद 6.0’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) दि. १९ – अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी स्टार्टअप्स अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यासाठी तसे पुरक वातावरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस (KCIIL) या उपक्रमाला सहा वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘स्टार्टअप संवाद 6.0’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बोलताना म्हणाले की, आपल्या उत्पादकता वाढवणे, कामगारांची उत्पादकता उंचावणे, ही गरज पूर्ण करण्यासाठी स्टार्टअप्स निर्णायक ठरतात. जळगावची अर्थव्यवस्था 25 अब्जांपर्यंत नेण्यासाठी स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांनी डी-ग्रोथ आणि स्थिरावलेली अर्थव्यवस्था टाळण्यासाठी उत्पादक स्टार्टअप्स गरजेचे असल्याचे सांगितले. “विद्यापीठ उत्तम असेल तर अर्थव्यवस्थाही बळकट होते. जळगाव विद्यापीठाने केसीआयआयएल च्या माध्यमातून स्टार्टअप संदर्भात उत्कृष्ट काम केले आहे. असे सांगताना त्यांनी स्टॅनफर्ड, हार्वर्ड आणि बंगळुरू शहराची उदाहरणे देत विद्यापीठाच्या मदतीने जळगावमधूनही फायनान्स कन्सल्टिंगसारखे व्यवसाय सुरू होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल अभिनंदन करत सांगितले की, “विद्यापीठाने आतापर्यंत 94 स्टार्टअप्सना मदत केली असून दोन कोटी रुपयांचे सहाय्य दिले आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या तीन जिल्ह्यांतील 200 महाविद्यालयांमध्ये सेल स्थापन करून जनजागृती करण्यात आली आहे. यशस्वी उद्योग निर्मितीसाठी टेक्नॉलॉजी, टॅलेंट आणि इनोव्हेशन ही त्रिसूत्री आवश्यक आहे. तरुणाईची ऊर्जा चांगल्या कामामध्ये वापरली तर ग्रामीण भागातदेखील उत्कृष्ट स्टार्टअप्स उभारता येतील. तुमच्या कल्पनांना विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही सर्वतोपरी मदत करू,” असे आश्वासन दिले.

यावेळी मंचावर नवोपक्रम व नवसंशोधन मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रा. अरुण इंगळे, KCIIL चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंदारे उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. नवीन खंदारे यांनी केंद्राच्या सहा वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. “स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया या उपक्रमांच्या धर्तीवर विद्यापीठात शिकत असतानाच विद्यार्थी उद्योजक घडावेत या उद्देशाने KCIIL ची स्थापना करण्यात आली,” असे त्यांनी सांगितले. यानंतर नवउद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कल्याण दाणी (संचालक, राम अँटी व्हायरस) यांनी मनोगत व्यक्त करत विद्यापीठाच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी पांडव तर आभार प्रदर्शन डॉ. राजेश जवळेकर यांनी केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button