
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातील यंदाची बदली प्रक्रिया चांगलीच चर्चेत राहिली. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बदली प्रक्रिया राबवताना सर्व पोलीस ठाण्यात आवश्यकतेनुसार पोलीस कर्मचारी देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यंदा मुख्यालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांसह नव्याने भरती झालेल्या नव्या दमाच्या कर्मचाऱ्यांना देखील पोलीस ठाणे देण्याचा प्रयत्न केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया नुकतेच पार पडली असून यावर्षी ६०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. मुख्यालयातील २५० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची आणि इतर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. यंदा बदली प्रक्रिया राबवताना पोलीस प्रशासनाने काही निकष ठरवले होते. निकषनुसार बदली प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केला असून काही कर्मचारी वगळता इतरांच्या बदल्या झाल्या आहेत.
अनेक पोलीस ठाण्यात कर्मचारी संख्या कमी
जळगाव जिल्ह्यात ३५०० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असून काही पोलीस ठाण्यात लोकसंख्या आणि गुन्ह्याच्या तुलनेत कर्मचारी कमी होते. जवळपास १५ पोलीस ठाण्यात तर महिला कर्मचारीच नव्हत्या. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी कर्मचारी संख्या कमी असल्याची बाब हेरली आणि त्यावर कामकाज सुरु केले. दोन दिवस माहिती घेत अभ्यास केल्यानंतर अधिक्षकांनी कुठे आणि किती कर्मचारी वाढवावे याचे नियोजन केले.
पोलीस ठाण्यांना दिले बळ
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बदली प्रक्रियेत केलेल्या बदलानंतर पुढीलप्रमाणे पोलीस ठाण्यातील कर्मचारी संख्या वाढणार आहे. माहिती पुढीलप्रमाणे, (पोलीस ठाण्याचे नाव/जुनी कर्मचारी संख्या/नवीन कर्मचारी संख्या) जिल्हापेठ पोलीस ठाणे ६३-७०, जळगाव शहर ८५-९५, शनिपेठ ५२-५५, जळगाव तालुका ५०-५५, रामानंद नगर पोलीस ठाणे ७७-८५, एमआयडीसी ९५-१०५, भुसावळ शहर ४४-५५, भुसावळ बाजारपेठ ६३-७०, भुसावळ तालुका ४३-५५, नशिराबाद ३९-५०, बोदवड ३९-४३, मुक्ताईनगर ६१-७०, वरणगाव ३६-४०, सावदा ४१-४२, रावेर ६८-७३, यावल ४९-५५, निंभोरा पोलीस ठाणे २८-३५, फैजपूर ३४-४०, भडगाव ५८-६०, मेहुणबारे ४२-५०, पाचोरा ६२-६५, फत्तेपूर २४-३१, पिंपळगाव हरेश्वर ३९-४६, अमळनेर पोलीस ठाणे ७०-८५, पारोळा ४९-७०, मारवाड २५-३३, धरणगाव ६७-७०, चोपडा शहर पोलीस ठाणे ६५-७०, चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे ४२-४५, अडावद पोलीस ठाणे ३०-३३ असे बदल करण्यात आले आहे.
नवीन कर्मचारी येणार
जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने गेल्या वर्षी राबविलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील १२५ पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून दि.९ जूनपासून ते जळगाव पोलीस दलात सक्रिय होणार आहेत. नवीन कर्मचारी आल्यानंतर ते पुन्हा आरसीपीमध्ये सक्रिय होतील.