Other

बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया
जळगाव: तब्बल साडेनऊ किलो वजनाची गाठ काढून ५७ वर्षीय महिलेला नवजीवन देण्याची यशस्वी कामगिरी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ शल्यचिकित्सकांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास सहन करणार्‍या या महिलेवर करण्यात आलेल्या जटिल शस्त्रक्रियेमुळे तिची प्रकृती आता चांगली असून पोटदुखी पूर्णपणे दूर झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील भिली येथील ५७ वर्षीय महिलेला गेल्या तीन महिन्यांपासून सतत पोटात दुखणे, पोटाचा आकार वाढणे तसेच दैनंदिन हालचाली करताना त्रास जाणवत होता. सुरुवातीला सामान्य आजार समजून उपचार घेतल्यानंतरही त्रास कमी झाला नाही. अखेर अधिक तपासणीसाठी तिला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात शल्यचिकीत्सा विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी महिलेची सविस्तर तपासणी केली. त्यानंतर सीटी स्कॅन करण्यात आला. या तपासणीत गर्भपिशवीच्या डाव्या बाजूच्या अंडाशयावर (लेफ्ट ओव्हरी) मोठ्या आकाराचा ट्युमर असल्याचे निदान झाले.
तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय
वाढलेल्या गाठीमुळे आतड्यावर मोठ्या प्रमाणात दबाव येत होता. त्यामुळे रुग्णाला सतत वेदना होत होत्या. गाठीचा आकार आणि स्थिती लक्षात घेता तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांच्या पथकाने अत्यंत काळजीपूर्वक ओपन ट्युमर एक्सिशन ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटातून तब्बल साडेनऊ किलो वजनाची गाठ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. गाठीचा मोठा आकार आणि शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या जवळ असलेले स्थान लक्षात घेता ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र डॉक्टरांच्या अनुभवामुळे आणि अत्याधुनिक सुविधांमुळे ही शस्त्रक्रिया कोणतीही गुंतागुंत न होता यशस्वी झाली.शस्त्रक्रियेनंतर महिलेस अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवून तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. डॉ. आदित्य पाटील, डॉ. अनुष्का साने, डॉ. प्रणव शेवाळे, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल, डॉ. सोनाली आणि परिचारीका यांच्या अथक प्रयत्नाने महिलेचे प्राण वाचले. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन दिवसांत तिच्या पोटातील वेदना पूर्णपणे कमी झाल्या असून ती आता व्यवस्थित चालणे-फिरणे आणि आहार घेणेही सुरू केले आहे.
कोट…
अंडाशयावरील गाठी सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे न दाखवता हळूहळू वाढू शकतात. त्यामुळे पोट सतत फुगणे, पोटदुखी, भूक कमी लागणे किंवा वजनात बदल जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नये. वेळेत तपासणी केल्यास अशा आजारांवर प्रभावी उपचार शक्य होतात. या रुग्णाच्या बाबतीत गाठ मोठ्या आकाराची असली तरी योग्य नियोजन, अनुभवी शल्यचिकित्सकांचे कौशल्य आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली. – डॉ. चैतन्य पाटील, शल्यचिकीत्सक, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button