

नगराध्यक्षांच्या कन्येने पंतप्रधानांना पाठवली राखी
नरेंद्र मोदींकडून पत्राद्वारे अरुश्रीचे कौतुक; ‘विकसित भारताच्या प्रवासात योगदान द्या’ असा संदेश
अमळनेर | प्रतिनिधी
रक्षाबंधनाच्या निमित्ताने अमळनेरचे नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांची कन्या कु. अरुश्री परीक्षित बाविस्कर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी आणि शुभेच्छापत्र पाठवले. देशातील नागरिकांचे आणि बालकांचे रक्षण व्हावे, तसेच पंतप्रधानांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, या भावनेतून तिने हे रक्षा सूत्र पाठवले होते. तिची राखी आणि पत्र पंतप्रधान कार्यालयात पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अरुश्रीला पत्र पाठवून तिचे कौतुक केले आहे.
रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अरुश्रीने रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवली होती. देशसेवा आणि राष्ट्रकल्याणासाठी कार्य करणाऱ्या पंतप्रधानांना उत्तम आरोग्य व निरामय आयुष्य लाभावे, अशी भावना तिने पत्रातून व्यक्त केली होती.
पंतप्रधानांनी पाठविलेल्या पत्रात अरुश्रीच्या या भावनेबद्दल आभार मानत तिचे कौतुक केले आहे. देशातील मुली आणि विद्यार्थिनी विकसित भारताच्या उभारणीत विविध क्षेत्रांत योगदान देत असल्याचे त्यांनी नमूद केले. क्रीडा, कौशल्य, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत मुली चमकदार कामगिरी करीत असून राष्ट्रकल्याणासाठी स्वयंस्फूर्तीने योगदान देत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
विकसित भारताच्या निर्मितीसाठी ‘शक्तीच्या सप्तधारा’च्या माध्यमातून उत्पादन, कृषी, तंत्रज्ञान, नवे विचार, गतिशक्ती, रक्षण, ग्रीन-ब्ल्यू उत्पादन आणि सांस्कृतिक शक्तीच्या नव्या ऊर्जेशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे पंतप्रधानांनी पत्रात नमूद केले आहे.
‘आपल्या प्रयत्नांनी आणि योगदानाने बदलत्या भारताच्या प्रवासात योगदान द्याल,’ असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुश्रीला तिच्या उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अरुश्री ही लोकनियुक्त नगराध्यक्ष व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर आणि डॉ. सौ. स्वाती परीक्षित बाविस्कर यांची कन्या आहे.






