शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना उबाठाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना उबाठाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
जळगाव (, प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उबाठाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. मागण्या त्वरीत मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी करून सरसकट कर्जमाफी द्यावी, अशीही जोरदार मागणी निवेदनातून करण्यात आली.
शासनाने शेतकी संघांसाठी ज्वारी खरेदीचे ३ हजार क्विंटलचे उद्दिष्ट वाढवून १० हजार क्विंटल करावे, तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे आठ महिन्यांपासून थकीत लाभ लाभार्थ्यांना तातडीने वितरीत करण्यात यावेत, अशी मागणीही यामध्ये समाविष्ट होती. याशिवाय, शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, अशी मागणीही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.
शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप भोळे, जिल्हा संघटक करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, नेत्या वैशाली सूर्यवंशी, तालुका प्रमुख उमेश पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, समन्वयक संतोष पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख जाकिर पठाण, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, प्रमोद घुगे, किरण भावसार, विजय बांदल, शोएब खाटीक, कलीम खान, शरीफ रंगरेज, सचिन चौधरी, विजय राठोड आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.