ड्रग्स विळखा : तुळजापूर पोलिसांना जमले ते जळगावच्या पोलिसांना का जमेना?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात किमान ६ वेळा ड्रग्स पकडण्यात आले असेल. पोलिसांनी मोठ्या शिताफीने कारवाई करीत ड्रग्स करणाऱ्यांना अटक करून जेलची हवा खायला भाग पाडले. पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद असली तरी तेवढीच संशयास्पद देखील आहे. शहरातील तरुण पिढी आणि शाळकरी मुलांना ड्रग्सचा विळखा बसत असताना कारवाई एका चौकटीत मर्यादित राहते हे मोठे आश्चर्य आहे. विशेष म्हणजे या विषयावर एकही सामाजिक संघटना आणि राजकीय पुढारी सतत पाठपुरावा करीत नसल्याने कुणालाच जळगावची काळजी नसल्याचे दिसते. नुकतेच गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास कौतुकास्पद असताना जळगावचा तपास पाहून प्रश्नचिन्ह निर्माण होते.
तुळजापूरमध्ये ड्रग्स तस्करीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे, ज्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्रात मोठा गाजावाजा होत आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३५ आरोपी निष्पन्न झाले आहेत, ज्यापैकी १४ जणांना अटक करण्यात आली आहे आणि २१ फरार आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी २०० जणांना नोटीस पाठवल्यानंतर सुमारे १०० लोक शहरातून गायब झाले आहेत. पहिली कारवाई १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाली. तपासात मुंबई कनेक्शन उघड झाले आणि संगीता गोळे नामक मुख्य सूत्रधारा महिलेला अटक करण्यात आली. आरोपी संगीता गोळेच्या बँक खात्यावरून सुमारे ५ कोटी रुपयांचे व्यवहार उघड झाले आहेत आणि तिच्याकडून काही प्रमाणात सोने जप्त करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत आहेत आणि या तस्करीच्या नेटवर्कमधील इतर लोकांचा तपास करत आहेत.
११८ कोटींचे केटामाईन ते लाखोंचे एमडी ड्रग्स
जळगाव जिल्ह्यात गेल्या ३ वर्षात रावेर, भुसावळ, जळगाव शहरात ड्रग्स विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. रावेरला ब्राऊन शुगर ते भुसावळ आणि जळगाव शहरात एमडी हे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. प्रत्येक गुन्ह्यातील आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. २०१३ मध्ये मुंबईच्या अंमली पदार्थ संचालनालयाने छापा टाकत जळगाव शहरातील एमआयडीसी आणि उमाळा जवळील कंपनीतून तब्बल ११८ कोटींचे केटामाईन हे अंमली पदार्थ हस्तगत केले होते. आजवरची जळगाव जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. जळगाव शहरातील ड्रग्स कनेक्शन तेव्हा पहिल्यांदा समोर आले होते.
मुंबईच्या पथकाने केला होता खोलवर तपास, सात आरोपींना जेल
जळगावच्या रेणुका इंडस्ट्रीजमध्ये १४ डिसेंबर २०१३ मध्ये मुंबई विभागाने छापा टाकून ११८ कोटी रुपयांचे केटामाईन जप्त केले होते. या प्रकरणात न्यायालयाने २६ एप्रिल २०१९ रोजी निकाल दिला. न्यायालयाने सात आरोपींना सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली आहे, तसेच २७ लाख ५० हजार रुपयांची रक्कम राज्य सरकारच्या महसुलात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. विशाल पुरी याला १३ वर्षे कारावास आणि १.७५ लाख दंड, वरुण कुमार तिवारी याला १० वर्षे कारावास आणि १ लाख दंड, तर श्रीनिवास राव याला १२ वर्षे कारावास आणि १.५ लाख दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने गौरीप्रसाद पाल, नित्यानंद थेवर, कांतीलाल सोनवणे, विशाल सोमनाथपुरी आणि विकास चिंचोले यांची निर्दोष सुटका केली.
जळगावचा तपास थांबला का?
जळगाव जिल्ह्यात आजवर झालेल्या ड्रग्सच्या प्रत्येक कारवाई तपासाचे धागेदोरे शेवटपर्यंत गवसत संपूर्ण साखळी तोडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. हजारो किलो गांजा पकडणे असो किंवा काही ग्राम एमडी पकडणे असो. पोलिसांचा तपास मर्यादितच राहिला. मुंबईच्या पथकाला जमले तर आजवर जळगावातील एकही पोलीस ठाण्याने करून दाखवले नाही. नुकतेच तुळजापूर पोलिसांनी देखील अतिशय बारकाईने तपास करीत गुन्ह्याची पाळेमुळे शोधून काढली मात्र जळगाव पोलीस अद्यापही आहे त्याच ठिकाणी अडकून आहे. ड्रग्सच्या प्रत्येक गुन्ह्यातील हा तपास म्हणजे पोलिसांच्या कामावर संशय घेणारा आहे. सामान्य जनता देखील अशा तपासाला कंटाळली असून ड्रग्सची पाळेमुळे पोलिसांनी उखडून फेकावी अशीच अपेक्षा प्रत्येक सुज्ञ जळगावकर व्यक्त करीत आहे.