जळगाव मतदार संघात चौरंगी लढतीचे चित्र, मात्र राजूमामा भोळे, जयश्री महाजन यांच्यातच खरा सामना

जळगाव– जळगाव शहर मतदार संघात चुरशीचे वातावरण असून प्रत्येक उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतले आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन उमेदवार मतांचा जोगवा मागताना दिसून येत आहे. अवघ्या बारा दिवसांचा कालावधी राहिला असून प्रचार जोमात सुरू असल्याचे चित्र आता सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
शहर मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ते हॅट्रिक करतात का याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे माजी महापौर जयश्रीताई महाजन यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आणि राजू मामा भोळे आणि जयश्रीताई हे दोघेही लेवा समाजाचे उमेदवार असल्याने या दोघांमध्ये तुल्यबळ लढत होणार असल्याचे चित्र समोर आहे. मात्र दुसरीकडे माजी उपमहापौर आणि भाजपचे पदाधिकारी असलेले डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपशी बंडखोरी केली आहे. तर ठाकरे गटाचे माजी महापौर कुलभूषण पाटील हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून उभे ठाकले असल्याने जळगाव शहर मतदार संघात चौरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे. विजयश्री कुणाला मिळते याकडेही जळगाव वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
एकीकडे जळगाव शहरातील खड्ड्यांचा विषय राज्यभर गाजलेला असताना जळगाव शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदारांशी संपर्क साधून आश्वासन देताना दिसून येत आहे.
माजी महापौर जयश्रीताई महाजन यांनी आधीपासूनच विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. त्यांच्यासमोर असणारे तुल्यबळ उमेदवार भाजपचे राजू मामा भोळे हे विजयाची हॅटट्रिक करतात की, जयश्री महाजन विजयश्री खेचून आणतात याकडे लक्ष लागले आहे. त्यातच भाजपचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे व मयूर कापसे यांनी बंडखोरी केली असून, तर उद्धवसेनेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे जळगाव शहरात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसत असले तरी खरा सामना राजू मामा घोडे आणि जयश्री महाजन यांच्यातच होणार असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान जळगावकर कोणाला कौल देतात हे येणारा काळच ठरवेल हे मात्र नक्की.