
महा पोलीस न्यूज । दि.७ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके जमीनदोस्त झाली असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचेही नुकसान झाले आहे. या संकटामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत गारपीट आणि मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. केळी, कापूस, मका आणि इतर पिके आडवी झाली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब कोसळले, ज्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी वाहनांवर झाडे पडल्याने वाहनांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट
जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना लवकरात लवकर मदत पोहचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही दिवस पाऊस आणि वादळी वारे कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
अवकाळी पावसामुळे तापमानात घट
अवकाळी पावसामुळे तापमानात ७ ते ८ अंशांनी घट झाली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, या गारव्यासोबतच शेतकरी आणि नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. पाऊस आणि वादळी वारे सुरू असताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने कळवले आहे.
ग्रामीण भागात बकऱ्या, म्हशींचा मृत्यू
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एरंडोल-पद्मालय रस्त्यावर वीज पडून ४ बकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. मौजे जळू ता.एरंडोल येथे धनसिंग अभिमन शिंदे यांच्या मालकीच्या बैलाच्या अंगावर अवकाशीय वीज पडून मृत्यू झालेला आहे. मौजे खडके खु.ता.एरंडोल येथे भिंत पडून वेडू धनसिंग पाटील यांचे पत्र्याचे शेडचे नुकसान झालेले आहे. मौजे गणेशनगर ता.एरंडोल येथे विष्णू धना जोगी यांचे झोपडीवर झाड पडून झोपडीचे व संसारपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. नशिराबाद येथे गारपीट सुरू असून काही पिकांचे नुकसान व घरावरील पत्र उडाल्याबाबत प्राथमिक माहिती आहे तसेच मौजे निमगाव बुद्रुक येथे काही पिकांचे नुकसान असल्याबाबत प्राथमिक माहिती आहे. मौजे वाकडी येथे गारपीट झाली असून घराच्या छतावरील पत्रे उडाली असून पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. धरणगाव तालुक्यात मौजे एकलग्न बु.येथील ढोलू विश्वनाथ पाटील यांची म्हैस गावात झाडाखाली बांधली असता वीज पडून जागीच ठार झाली. मौजे धारागीर येथे सुरेश गोपीचंद पाटील यांच्या म्हैशीवर वीज पडून मृत्यू झाला आहे. मौजे पुनगाव युवराज एकनाथ बाविस्कर यांच्या म्हशीवर झाड पडून तिचा मृत्यू झाला. धानोरा व देवगाव प्रचंड वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. लोणी व पंचक या गावांमध्ये पपई पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
शहरात दुकान, वाहनांचे मोठे नुकसान
जळगाव शहरात दोन दिवसात अनेक ठिकाणी वाहन आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी गांधी नगर परिसरात रिक्षाचे मोठे नुकसान झाले होते. बुधवार माया देवी नगराजवळ झाडाची फांदी पडल्याने रिक्षा क्रमांक एमएच १९.व्ही.८६०७ चे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, दैव बलवत्तर असल्याने रिक्षा चालक बाळकृष्ण माधव गायकवाड हे बचावले आहेत. जिल्हाधिकारी निवास बाहेर वृक्ष उन्मळून एक चारचाकीचे नुकसान झाले आहे. आरटीओ कार्यालयात विद्युत पुरवठा आणि इंटरनेट वायर तुटल्याने कामकाज ठप्प झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय कँटीनवर झाड पडून नुकसान झाले आहे.