महाराष्ट्र पोलिस दलात मोठी उलथापालथ: 22 पोलिस अधीक्षक, उपायुक्तांच्या बदल्या

महाराष्ट्र पोलिस दलात मोठी उलथापालथ: 22 पोलिस अधीक्षक, उपायुक्तांच्या बदल्या
मुंबई | प्रतिनिधी l महा पोलीस न्यूजl महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, राज्य सरकारने 22 पोलिस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदलांमुळे काही जिल्ह्यांतील अचानक झालेल्या नियुक्त्यांनी प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कोल्हापूर, सातारा आणि रायगडमध्ये नवे नेतृत्व
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलिस दलात उपायुक्तपदी बदली झाली आहे, तर सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांना बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नव्याने स्थापन झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी पुणे शहर पोलिस दलातील गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची रायगड पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
धाराशिवमध्ये रितू खोकर यांच्यापुढे आव्हान
धाराशिव जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी रितू खोकर यांची नियुक्ती झाली असून, त्या सांगली येथील अप्पर पोलिस अधीक्षक होत्या. सध्याचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची बदली करण्यात आली आहे, मात्र त्यांना अद्याप नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही. गृह विभागाने त्यांना स्वतंत्रपणे नवे पद देण्याचे संकेत दिले आहेत. रितू खोकर यांच्यासमोर तुळजापूरमधील अलीकडील ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आहे.
कायदा-सुव्यवस्थेसाठी महत्त्वाचे पाऊल
या बदल्यांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिस प्रशासनाला नवे नेतृत्व मिळणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हे निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असून, नव्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.