
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
महापौर दीपमाला काळे यांच्या मार्गदर्शनाखाली “इको फ्रेंडली”संकल्पना
जळगाव : शहर महानगरपालिकेच्या यंदाच्या मानाच्या श्री गणेशोत्सवाने परंपरा आणि आधुनिक सामाजिक जनजागृतीचा एक सुंदर संगम घडवून आणला आहे. महापालिकेच्या १७ व्या महापौर दीपमाला काळे यांच्या नेतृत्वाखाली व संकल्पनेतून यंदाचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात, वाजत-गाजत आणि मुख्य म्हणजे पूर्णपणे पर्यावरणपूरक वातावरणात साजरा होत आहे.
स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग या तिन्हींचा मेळ घालत महापौरांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव मनपाने हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने ‘आदर्श उत्सव’ ठरवला आहे.
*यंदाच्या उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये*
पर्यावरणपूरक श्रीमूर्ती व आरास: यंदाची मानाची बाप्पाची मूर्ती ही केळीच्या लगद्यापासून साकारण्यात आली असून, तिला रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक गेरूने रंगवण्यात आले आहे. सकाळी पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते, तर संध्याकाळी प्रभागनिहाय (रोटेशननुसार) नगरसेवकांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन केले जात आहे.
उत्सव परिसरात प्लास्टिकमुक्ती (कापडी पिशवीचा वापर), वृक्षारोपण (‘झाडे लावा, झाडे जगवा’) आणि मनपाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे डिजिटल फलक व एलईडी स्क्रीनवर शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जात आहेत. सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारी पथनाट्ये आणि तरुणाईसाठी खास ‘सेल्फी पॉईंट’ उभारण्यात आला आहे.
दररोज गणेशोत्सवामध्ये विविध विषयांवर पथनाट्य साजरे होत आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या विविध विषयांवर आधारित माहितीपट दाखविला जात आहे. तसेच भारुड देखील रोज घेतले जाते. त्याचबरोबर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये जे विजेते आहेत त्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातात. त्याचबरोबर मोठ्या खेळामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींपैकी जे विजेते आहेत त्यांना एक साडी बक्षीस दिली जात आहे. आतापर्यंत ३ दिवसांमध्ये १५ हजार नागरिकांनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन आपली मनोकामना केली आहे. त्याचबरोबर शनिवारी दि. १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. अनामिका मेहरा यांच्या सुश्राव्य वाणीतून भक्तीगीते सादर होणार आहेत.







