आषाढी वारीसाठी जळगाव जिल्ह्याला २.७२ कोटींचा निधी; वारकऱ्यांना मिळणार अत्यावश्यक सुविधा

आषाढी वारीसाठी जळगाव जिल्ह्याला २.७२ कोटींचा निधी; वारकऱ्यांना मिळणार अत्यावश्यक सुविधा
अमळनेर प्रतिनिधी आषाढी वारी २०२६ निमित्त जळगाव जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य शासनाने तब्बल २ कोटी ७२ लाख ८१ हजार ७५ रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीतून पालखी मार्गावरील मुक्कामस्थळी फिरती शौचालये, स्नानगृहे तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या निर्णयाचा लाभ श्री संत मुक्ताई संस्थान, श्री सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थान अमळनेर तसेच श्रीराम मंदिर संस्थान जळगाव यांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना होणार आहे.
विशेषतः अमळनेर येथील सखाराम महाराज संस्थानच्या पालखीसाठी शौचालय, स्नानगृह आणि पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे वारकऱ्यांच्या सोयीस मोठा हातभार लागणार आहे.
राज्य शासनाने या निधीपैकी पहिल्या टप्प्यात १० टक्के म्हणजेच २७ लाख २८ हजार रुपयांचा निधी वितरित केला असून, उर्वरित निधी उपलब्ध तरतुदीनुसार देण्यात येणार आहे. अषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने शासनाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.






