
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जळगावकर जागृत जनतेचा पाठिंबा; सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
जळगाव : लडाखमधील शैक्षणिक, पर्यावरणीय आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आज १९ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देण्यासाठी जळगावातील जागरूक नागरिक व समविचारी व्यक्तींची बैठक आज गजानन मालपुरे यांच्या कार्यालयात संपन्न झाली.
या बैठकीस गजानन मालपुरे, शरद तायडे, ॲड. जमील देशपांडे, विनोद शिंदे, अशोक लाडवंजारी, जमील शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
बैठकीत सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मार्गाने मांडलेल्या मागण्यांच्या समर्थनार्थ जळगावातून एकजुटीने आवाज उठविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे शांततापूर्ण निदर्शने करण्यात येणार असल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी मत व्यक्त केले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न हा केवळ एका राज्याचा किंवा एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण देशातील तरुणाईच्या भविष्याशी निगडित आहे. शिक्षण, पर्यावरण आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देणे ही प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे.
बैठकीत जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व समविचारी सामाजिक संस्था, युवक संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, पालक तसेच जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने निदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
आवाहन
दिवस : सोमवार
वेळ : दुपारी १२.०० ते १.००
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
जळगावकर जागृत जनतेच्या वतीने आयोजित या शांततापूर्ण निदर्शनात शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन गजानन मालपुरे जमील देशपांडे जमील शेख शरद तायडे अशोक लाडवंजारी चंद्रकांत पाटील विनोद शिंदे सुनिल माळी ज्ञानेश्वर कोळी पियुष गांधी प्रमोद पाटील ललीत शर्मा विनायक पाटील चेतन पवार प्रदिप पाटील रमेश पाटील ईत्यादी आयोजकांनी केले आहे.






