जामनेरात भूकरमापकास २०० रुपयांची लाच घेताना अटक


जामनेरात भूकरमापकास २०० रुपयांची लाच घेताना अटक
६५ वर्षीय शेतकऱ्याच्या तक्रारीवरून कारवाई; २०१२ नंतर दुसऱ्यांदा लाचखोरीच्या प्रकरणात अडकला
जामनेर प्रतिनिधी शेताच्या मोजणीसाठी लागणारे कागदपत्रे देण्यासाठी अवघ्या २०० रुपयांची लाच घेणाऱ्या जामनेर भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. भगवान रोहिदास गायकवाड असे संशयित कर्मचाऱ्याचे नाव आहे. यापूर्वी २०१२ मध्ये भुसावळ येथे लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालेला गायकवाड १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
नेरी बुद्रूक येथील एका ज्येष्ठ शेतकऱ्याने शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक स्कीम पत्रक व टिपण उताऱ्यासाठी अर्ज केला होता. या प्रती देण्यासाठी भूकरमापक गायकवाड याने ७०० रुपयांची मागणी केली.
शेतकऱ्याने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर मंगळवारी सापळा रचून पडताळणी करण्यात आली. तडजोडीत निश्चित झालेले २०० रुपये कार्यालयात स्वीकारताना गायकवाडला पथकाने ताब्यात घेतले. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, हवालदार बाळू मराठे, प्रणेश ठाकूर आणि सचिन चाटे यांनी ही कारवाई यशस्वी केली.







