बोरखेडा येथे उष्माघाताने तरुणाचा मृत्यू

बोरखेडा येथे उष्माघाताने तरुणाचा मृत्यू
चोपडा : जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका आता जीवघेणा ठरू लागला असून चोपडा तालुक्यातील बोरखेडा येथे उष्माघातामुळे २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. चेतन कृष्णा पाटील असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास कडक उन्हामुळे चेतन पाटील याची प्रकृती अचानक बिघडली. उष्णतेच्या तीव्र झळांमुळे त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने गावातील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, उष्माघातामुळे चेतनचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर बोरखेडा गावासह परिसरात शोककळा पसरली असून पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चेतन हा कृष्णा हिंमत पाटील यांचा मुलगा असून त्याच्या पश्चात आई-वडील व बहिणी असा परिवार आहे. तरुण वयात झालेल्या निधनामुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशांच्या घरात पोहोचत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.





