जळगावच्या डीबीला ‘चार्ज’ची, गोपनीयला ‘बुस्टर डोस’ची गरज!

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारांनी डोके वर काढले अशी सध्या परिस्थिती दिसत असली तरी तो निव्वळ योगायोग आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात आलेल्या दोन्ही पोलीस अधिक्षकांचा कार्यकाळ शांततेत आणि कोणत्याही मोठ्या निवडणुकीविना पार पडला मात्र नुकतेच पदभार स्विकारलेल्या डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासाठी पुढील कार्यकाळ अतिशय अडथळ्यांचा आणि जबाबदारीचा असणारा आहे. दोन वर्ष कायदा व सुव्यवस्था कायम राखताना डॉ.रेड्डी यांना आतापासून मायक्रो नियोजन करून मरगळलेल्या पोलीस प्रशासनात नवा उत्साह भरावा लागणार आहे. विशेषतः गुन्हेगारांशी सलगी ठेवणाऱ्या डीबीला चार्ज करावे लागणार असून नावालाच शिल्लक राहिलेल्या गोपनीय विभागाला बुस्टर डोस द्यावा लागणार आहे.
जळगाव जिल्हा तसा शांततापूर्ण आणि नेहमी कायदा व सुव्यवस्था राखणारा जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याला लाभलेल्या आजवरच्या पोलीस अधिक्षकांच्या काळात क्वचितच एखाद्याचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. कोरोना काळाच्या अखेरीस जिल्ह्याला लाभलेले पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांचा एक वर्षाचा काळ कोरोनात तर दुसरे वर्ष देखील शांततेत गेले. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पदभार घेतल्यानंतर सुरुवातीचा कार्यकाळ काहीसा खडतर होता मात्र नंतर तो देखील सुरळीत पार पडला. एम.राजकुमार यांनी आपल्या टीमवर दाखविलेला विश्वास आणि डोक्यावर बर्फ या तत्वाने कार्य केले मात्र जशास तसे उत्तर दिल्याने त्यांचा १५ महिन्यांचा कार्यकाळ यशस्वी ठरला. गत दोन्ही पोलीस अधिक्षकांच्या कार्यकाळात एक महत्वाची घडामोड टळली आणि ती म्हणजे ‘निवडणूक’. दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात निवडणूक टळल्याने बहुतांशी वाद देखील तिथेच थांबले.
पोलीस अधिक्षकांच्या स्वागतालाच गुन्हेगारी..
जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दहा दिवसांपूर्वीच पदभार स्विकारला. पदभार घेताच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर वाळूमाफियांनी केलेला हल्ला, चाळीसगावात माजी नगरसेवकाचा गोळ्या झाडून खून, दहीगावात दोन समुदायात तणाव, स्वातंत्र्य चौकात निघालेल्या बंदुका, निंभोरा येथे झालेला तणाव या सर्व घटना एकामागोमाग आल्या. पोलीस अधिक्षकांचे स्वागत गुन्हेगारीने झाले? असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण, क्वचितच एखादी घटना टाळता येते मात्र अचानक घडलेल्या घटनेला टाळणे शक्य होत नाही तर तिची तीव्रता कमी करून इतर ठिकाणी पडसाद न उमटू देणे महत्वाचे असते. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे त्यात यशस्वी ठरले. यावल तालुक्यातील दहीगाव येथे झालेला तणाव दूर करण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी उपस्थित असतांना देखील दहा तासात जळगाव ते नाशिक असा दोन वेळा जवळपास ८०० किलोमीटरचा प्रवास करून रात्री १० वाजता ते गावात पोहचले आणि वाद पूर्णतः मिटला. तणावाचे पडसाद इतरत्र न पोहचू देता कायदा व सुव्यवस्था राखण्यात ते यशस्वी ठरले.
निवडणुकीच्या तोंडावर फुटणार वादाला तोंड..
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून काही दिवसात आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर अशी दोन लोकसभा मतदार संघ आहेत. देशातील वातावरण सध्या ढवळून निघाले असून जातीय तणावाच्या घटना वाढल्या आहे. जळगावात देखील यंदा विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याच्या चर्चा असून त्यातच राज्यातील पक्षफोडीच्या राजकारणाने आणखी पेच वाढणार आहे. सोशल मीडियात सुरु असलेल्या जातीय तणावपूर्ण पोस्ट, आरक्षणाची वाढती मागणी, जातीजातीत वाढणारा दुरावा यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद वाढण्याची शक्यता आहे. नुकतेच झालेल्या दोन्ही तणावाच्या घटना देखील त्याचेच उदाहरण आहे. राजकीय मंडळी एकमेकांवर चिखलफेक करतील आणि कार्यकर्ते आपसात भिडतील ते वेगळेच.
वरिष्ठ अधिकारी, प्रभारी अधिकाऱ्यांवर हवा अंकुश..
जळगाव जिल्हा पोलीस दलात पोलीस अधिक्षकांच्या ताफ्यात दोन अपर पोलीस अधीक्षक, ८ उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी आहेत. जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता काही प्रभारी अधिकारी तर वरीष्ठांपेक्षा देखील वरचढ झाले आहे. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करता काहीतरी उडवाउडवीची उत्तरे देण्यात ते तरबेज झाले आहेत. पोलीस अधिक्षकांनी आपल्या दहाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात घेत इतरांवर अंकुश ठेवला तर पुढील कार्यकाळ सुरळीत राहण्यास मदत होणार आहे, नाहीतर किरकोळ विषयासाठी देखील मंत्री आणि लोकप्रतिनिधी इतकंच काय तर केंद्रातून आणि राज्यातून फोन येणे काही विशेष नाही. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया पोलीस ठाण्यातून दर आठवड्याला होत राहिल्यास कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरेल.
गुन्हेगारांशी मैत्री ठेवणाऱ्या ‘डीबी’ला चार्ज करण्याची गरज..
जळगाव जिल्ह्यातील पोलिसांचे आणि विशेषतः डीबी पथकातील कर्मचाऱ्यांचे गुन्हेगार आणि अवैध धंदे चालकांशी असलेले मैत्रीचे संबंध काही लपून राहिलेले नाही. गुन्हेगारांशी असलेल्या संबंधामुळे अनेकांना निलंबीत व्हावे लागले तर अनेकांची चौकशी सुरु झाली. काही महाभाग तर स्वतःच अवैध धंद्यात भागीदार आहेत आणि काही स्वतःच गुन्हेगार ठरलेत. गुन्हेगारांसोबत एकाच गाडीत फिरणे, पार्ट्या करणे, पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा करणे, गोपनीय माहिती पुरविणे यामुळे गुन्हेगार पोलिसांना गृहीत धरू लागले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात असलेली डीबी सध्या नावालाच राहिली असून केवळ कलेक्शनच्या कामासाठी कर्मचारी डीबीमध्ये येण्याची स्पर्धा करतात मात्र मोजकेच गुन्हे शोधचे काम करतात. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्वतः विभागानुसार डीबी पथकाची बैठक घेत उपदेश वजा सूचनांचा कानमंत्र देणे आवश्यक आहे. सर्व डीबीला चार्ज करून आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिल्यास गुन्हेगारी आटोक्यात येणे शक्य होऊ शकेल अन्यथा गुन्हेगारांशी मैत्री पोलीस अधिक्षकांनाच अडचणीत आणेल.
गोपनीय विभागाला हवा बुस्टर डोस..
पोलीस खात्यातील महत्वाचा विभाग समजल्या जाणाऱ्या गोपनीय विभागाचे काम अलीकडच्या काळात गोपनीय राहिलेले नाही. गोपनीय विभागात असलेले कर्मचारी देखील कलेक्शन करू लागल्याने इतरांच्या पोटात दुखू लागले आहे. एकेकाळी गोपनीय खात्यातील कर्मचाऱ्यांची ओळख देखील गोपनीय होती म्हणूनच काय तर जिल्ह्यातील सिमीचे नेटवर्क उघड झाले. सध्या तर गोपनीय विभागात कार्यरत असलेले कर्मचारी सहज ओळखले जातात. पासपोर्ट आणि विविध परवानगीच्या कामासाठी त्यांच्याकडे ये-जा करणाऱ्यांची गर्दी वाढल्याने ते देखील लोकल झाले. गोपनीय बातम्या मिळणे सध्या अवघड होऊन बसले असल्याने येणाऱ्या काळात ते धोक्याचे ठरेल. निवडणुकीच्या काळात गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांना अगोदरच पूर्वकल्पना असल्यास त्यादृष्टीने नियोजन करणे शक्य होते मात्र गोपनीय विभागातील कर्मचारी आपली मूळ कामे सोडून इतर कामे करीत असतील तर अधिकाऱ्यांना इतर विभागाच्या माहितीच्या आधारेच आपले नियोजन आखावे लागेल. पोलीस अधिक्षकांनी गोपनीय विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिल्यास पुढील अनेक घटना रोखता येतील.