कांचन नगरातील जय जगदंबा मित्र मंडळातर्फे गणरायाच्या पाटपूजनाचा भक्तिमय सोहळा

कांचन नगरातील जय जगदंबा मित्र मंडळातर्फे गणरायाच्या पाटपूजनाचा भक्तिमय सोहळा
‘इंधन वाचवा, देश वाचवा’ या संकल्पनेवर यंदाची पर्यावरण जनजागृतीची आकर्षक आरास
जळगाव | प्रतिनिधी
संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधत कांचन नगर येथील जय जगदंबा मित्र मंडळातर्फे गणरायाच्या पाटपूजनाचा भक्तिमय सोहळा उत्साहात पार पडला. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते विधिवत पाटपूजन करण्यात आले.
ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत तरुणांनी मिरवणूक काढत पाटपूजन सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गणरायाच्या आगमनाची तयारी भक्तिमय वातावरणात करण्यात आली.
यावेळी आमदार सुरेश भोळे यांच्यासह नगरसेवक सागर सोनवणे, विजय बांदल, निलेश तायडे तसेच माजी नगरसेवक किशोर बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदाही जय जगदंबा मित्र मंडळ सामाजिक संदेश देणारी आरास साकारणार असून “इंधन वाचवा, देश वाचवा” या संकल्पनेवर आधारित पर्यावरण जनजागृतीचा देखावा सादर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. इंधन बचतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी तुषार कोळी, राहुल सोनवणे, अंकुश राजपूत, हर्षल राजपूत, प्रदीप राजपूत, वीरेंद्र वाल्हे, ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
आमदार सुरेश भोळे म्हणाले, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ‘इंधन वाचवा, देश वाचवा’ यासारख्या जनजागृतीपर संकल्पना समाजाला योग्य दिशा देणाऱ्या आहेत. प्रत्येकाने पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा बचतीची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज आहे.”







