CAA : सिंधी समाजाने मानले केंद्र सरकारचे आभार
माजी आ.गुरुमुख जगवानी यांनी २०१४, २०१६ मध्ये घेतली होती राजनाथ सिंग यांची भेट

महा पोलीस न्यूज | १३ मार्च २०२४ | केंद्र सरकारने देशात CAA नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील माजी आ.गुरुमुख जगवानी यांनी २०१४ आणि २०१६ मध्ये लखनऊ येथील संत व शिष्टमंडळासह तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन तात्काळ सीएए लागू करण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने देशात कायदा लागू केल्याने सिंधी समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारचे सिंधी समाजाने आभार मानले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना आभार पत्र पाठविले आहे.
देशभरात केंद्र सरकारकडून नागरिकत्त्व सुधारणा कायदा अर्थात सीएए लागू करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमध्ये असलेल्या हजारो अल्पसंख्यांकांना या कायद्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पाकिस्तानात सिंधी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास असून त्यांच्यावर अगणित अत्याचार देखील होत असतात. जुन्या कायद्याचा आधार घेत दरवर्षी काही प्रमाणात सिंधी समाजवासियांना भारताचे नागरिकत्व मिळत होते, परंतु नवीन सुधारणेमुळे तो मार्ग अधिक सुकर होणार आहे.
सिंधी समाजाच्या अडचणी लक्षात घेता माजी आ.गुरुमुख जगवानी, लखनऊ येथील संत यांच्यासह समाजाच्या शिष्टमंडळाने २०१४ मध्ये तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांची भेट घेऊन तात्काळ नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याची मागणी केली होती. तसेच २०१६ मध्ये देखील राजनाथ सिंग हे गृहमंत्री असताना पुन्हा भेट घेतली होती. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागणी पूर्ण केल्यास सिंधी समाजासह अल्पसंख्यांकांना कसा लाभ होईल हे तेव्हा पटवून देण्यात आले होते. अखेर मोदी सरकारने वचनपूर्ती केली असून देशात केंद्र सरकारकडून नागरिकत्त्व सुधारणा कायदा अर्थात सीएए लागू करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत घोषणा केली आहे.
सिंधी समाजाने मानले आभार
दोन दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा करीत देशात नागरिकत्त्व सुधारणा कायदा अर्थात सीएए लागू करण्याची घोषणा केली आहे. सीएए लागू केल्याने देशभरातील सिंधी समाजाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले आहे. आभार पत्र मेलद्वारे सरकारला पाठविण्यात आले असल्याची माहिती माजी आ.गुरुमुख जगवानी यांनी दिली आहे.