अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर

अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर
महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. अमरदीप पाटील तर मंत्री आर्यन भालशंकर यांची घोषणा
जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव महानगराच्या महानगर कार्यकारिणीची घोषणा मुळजी जेठा महाविद्यालयातील सोहम सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. यावेळी महानगर तसेच ३ नगरांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
जळगाव महानगर अध्यक्ष म्हणून प्रा. अमरदीप पाटील यांची, तर महानगर मंत्री म्हणून आर्यन भालशंकर यांची घोषणा करण्यात आली. तसेच महानगर सहमंत्री म्हणून मनोज कुंभारे व अंकुश सर्वेकर यांची घोषणा करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज नगर अध्यक्ष म्हणून प्रा. बिपाशा पात्रा व नगरमंत्री म्हणून रमण चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर अध्यक्ष म्हणून प्रा. दीपक पाटील व नगरमंत्री म्हणून ओम गुरव, तर विद्यापीठ नगर अध्यक्ष म्हणून प्रा. प्रिती सोनी व नगरमंत्री म्हणून आयुष महाजन यांची घोषणा करण्यात आली. तसेच जळगाव महानगरातील १० महाविद्यालय अध्यक्षांचीही घोषणा यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले, “विद्यार्थी परिषद ही केवळ संघटनात्मक कार्य करणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि समाजहितासाठी नेतृत्व घडविणारे व्यासपीठ आहे. जळगाव महानगरातील नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून महाविद्यालयीन परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत विद्यार्थीहिताच्या विविध विषयांवर सातत्याने काम केले जाईल. नव्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वातून जळगाव महानगरात विद्यार्थी चळवळीला अधिक व्यापक आणि सकारात्मक दिशा मिळेल.”
नवनिर्वाचित महानगर मंत्री आर्यन भालशंकर म्हणाले, “जळगाव महानगरातील प्रत्येक महाविद्यालयापर्यंत अभाविपचे संघटन पोहोचवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच महाविद्यालयांमध्ये सकारात्मक विद्यार्थी नेतृत्व उभे करण्यासाठी कार्य करू.”
यावेळी देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, प्रदेश संघटनमंत्री श्री.सिद्धेश्वर लटपटे, जळगाव विभाग संघटनमंत्री अजित केंद्रे, जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. भूषण राजपूत यांच्यासह विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थीहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडत जळगाव महानगरातील विद्यार्थी चळवळीला अधिक बळकटी देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.







