
लातूर घटनेचा निषेध; सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनमार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – लातूरमध्ये घडलेल्या तरुण आमिर पठान आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनच्यावतीने जिल्हाधिकारी मार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले. जात आणि धर्माच्या आधारावर कोणत्याही भारतीय नागरिकाला हिणवणे, शंका घेणे आणि ‘पाकिस्तानी’ म्हणून संबोधणे अत्यंत गंभीर प्रकार असून अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
लातूरमध्ये आमिर पठान या युवकावर किरकोळ वादाच्या पार्श्वभूमीवर एका कारचालकाने भररस्त्यात मारहाण केली, तसेच त्याला “तू पाकिस्तानातून आलास का?” असे विचारत अपमानित केले. या घटनेचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली गेली. या अपमानामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या आमिरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे हे प्रकरण केवळ वैयक्तिक नसून सामाजिक सलोख्याला सुरुंग लावणारे असल्याने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच यापुढे कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याच्या धर्म, जातीच्या आधारावर शंका घेणे किंवा अपमानित करणे हे देशविघातक कृत्य ठरेल, असा इशाराही देण्यात आला.
निवेदन देताना सै. अयाज अली नियाज अली, फिरोज प्लंबर, नूरा पहेलवान, जमील शेख, नाझीम पेंटर, कामिल खान, शफी ठेकेदार, शेख अयान, हाजी सलीमुद्दीन आदी उपस्थित होते.