श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
अमळनेर, प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत रयतेचे राजे, दूरदर्शी व सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या सामाजिक, लोकाभिमुख आणि परिवर्तनवादी कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नुकतेच शहराध्यक्षपदी निवड झालेले व दैनिक जनवास्तवचे संपादक-पत्रकार श्री. चेतनभाऊ राजपूत हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक महादर्पणचे संपादक श्री. रविंद्रभाऊ मोरे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती आठवले, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, प्रमुख वक्त्या कु. स्नेहल शिसोदे, ज्येष्ठ कला शिक्षक श्री. एस. एस. माळी, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. के. आर. बाविस्कर, श्रीमती आर. एस. सोनवणे आणि ज्येष्ठ लिपिक श्री. शामभाऊ पवार उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. चेतनभाऊ राजपूत तसेच नुकताच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पत्रकार श्री. रविंद्रभाऊ मोरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि शाहू महाराजांचे पुस्तक देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी शाहू महाराजांचे कार्य, सामाजिक न्यायासाठी दिलेले योगदान, आरक्षणाची संकल्पना आणि गरीब, वंचित व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या की, शाहू महाराजांनी सर्व समाजघटकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आणि त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.
यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन व कार्यावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सकाळ व दुपारच्या सत्रातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थिनींना शाहू महाराजांवरील पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वक्त्या कु. स्नेहल शिसोदे यांनी शाहू महाराजांचा जीवनपट उलगडून त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात श्री. चेतनभाऊ राजपूत यांनी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सामाजिक समतेसाठी केलेले कार्य, शिक्षणाचा प्रसार, रोजगार निर्मिती, व्यायामशाळा व आखाड्यांची उभारणी आणि सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस. एस. देवरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. पी. एस. सराफ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय समितीचे अध्यक्ष श्री. जितेंद्र जैन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






