Social

चाळीसगावमध्ये ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

चाळीसगाव | भूषण शेटे – (दि. ७ ऑगस्ट) – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमांतर्गत चाळीसगावात तक्रार निवारण सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेला स्थानिक आमदार मंगेश चव्हाण आणि CEO मीनल करनवाल यांची विशेष उपस्थिती होती.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या समस्या, तक्रारी आणि अडचणी थेट प्रशासनासमोर मांडता याव्यात हा आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या CEO ने जनसंपर्क साधून तक्रार निवारणासाठी थेट तालुक्याच्या ठिकाणी येऊन पुढाकार घेतला असल्याने या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही सभा संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालली. या दरम्यान, १०० हून अधिक नागरिकांनी आपापल्या तक्रारी लेखी स्वरूपात सादर केल्या. काही तक्रारींवर जागेवरच तोडगा काढून त्या निकाली काढण्यात आल्या, तर उर्वरित तक्रारींची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागांना कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

या सभेमुळे ग्रामीण भागातील लोकांना ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा, कृषी आणि बांधकाम यांसारख्या विविध विभागांशी संबंधित प्रश्न थेट मांडण्याची संधी मिळाली. यामुळे प्रशासनाशी थेट संवाद साधता आल्याने त्यांच्या समस्या लवकर सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे, जगताप, जिल्हा प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास भदाणे, कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम सुनील पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल पाटील, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा राहुल जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन परदेशी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण मॅडम यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button