
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय, जळगाव यांच्या वतीने मंडळाचा ७३ वा वर्धापन दिन बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने वृक्षसंवर्धन तसेच स्वरसंध्या या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने आपल्या स्थापनेपासून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण कल्याणासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. यंदा मंडळाने ७४ व्या वर्षात पदार्पण केल्याच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षसंवर्धन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याचबरोबर सायंकाळी ५.३० वाजता सुप्रसिद्ध गीतांचा बहारदार ‘स्वरसंध्या’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संगीतप्रेमींसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार असून रसिकांना सुरेल गीतांचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
हा कार्यक्रम ललित कला भवन, शाहूनगर, रिंग रोड, जळगाव येथे आयोजित करण्यात आला असून कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी यांनी केले आहे.
यावेळी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत “पर्यावरण रक्षणाची धरा कास, तरच होईल मानवाचा विकास” हा संदेशही मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे. सामाजिक उत्तरदायित्व आणि सांस्कृतिक जपणूक यांचा संगम घडविणारा हा कार्यक्रम जळगावकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.






