पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या दुर्घटनेप्रकरणी तिघा मालकांना दहा वर्षांची शिक्षा
अमळनेर न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या दुर्घटनेप्रकरणी तिघा मालकांना दहा वर्षांची शिक्षा
अमळनेर न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
अमळनेर (प्रतिनिधी): पारोळा येथील सावित्री फायर वर्क्स फॅक्टरीत २००९ मध्ये घडलेल्या भीषण अग्निकांडात २१ जणांचा बळी गेला होता. १६ वर्षांनंतर, अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी तिघा मालकांना दोषी ठरवत १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.ही दुर्घटना १० एप्रिल २००९ रोजी पारोळा येथील फॅक्टरीत घडली. स्फोटक पदार्थांमुळे लागलेली आग वेगाने पसरली, ज्यामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आणि ३९ जण गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी गोविंद एकनाथ शिरोळे, चंद्रकांत एकनाथ शिरोळे आणि मनीषा चंद्रकांत शिरोळे यांच्यासह नऊ जणांवर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
तपासात समोर आले की, फॅक्टरीचा परवाना कालबाह्य होता, कामगारांना सुरक्षा प्रशिक्षण नव्हते आणि बालकामगार कायद्याचे उल्लंघन झाले होते. यामुळे हानीचे प्रमाण वाढले.अमळनेर सत्र न्यायालयात चाललेल्या खटल्यात ४२ साक्षीदार तपासले गेले, परंतु ३८ साक्षीदार फितूर झाले.
तरीही, न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी सरकारी साक्षीदारांच्या विश्वसनीय जबानीवर आधारित तिघा मालकांना दोषी ठरवले.न्यायालयाने भादंवि कलम ३०४(२) अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, तसेच स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत २ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंड ठोठावला. दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील.
उर्वरित पाच आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, तर एका आरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला.सरकार पक्षातर्फे अॅड. मयूर अफूवाले आणि नंतर अॅड. राजेंद्र चौधरी यांनी यशस्वीपणे बाजू मांडली.