Other

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर : तीन मृत्युमुखी, अनेक जखमी; वाहतूक व वीज पुरवठा ठप्प

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर : तीन मृत्युमुखी, अनेक जखमी; वाहतूक व वीज पुरवठा ठप्प

जळगाव | प्रतिनिधी – बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. या नैसर्गिक आपत्तीत तीन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने आणि विजेचे खांब वाकल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अनेक भागांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला.

रात्री आठच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावताच, पळासखेडा मिरा (ता. चोपडा) येथे चिंचेच्या झाडाखाली आसरा घेतलेल्या प्रियानी बरेला (३४) या आदिवासी महिलेस झाड कोसळून जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत झाडाच्या आडोशाला उभे असलेले इतर १५ जण जखमी झाले आहेत.

पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील पितांबर वाघ (५०) यांचा वीज पडून मृत्यू झाला, तर फरकांडे (ता. एरंडोल) येथील नारायण पाटील (६८) यांना वादळात उडालेल्या पत्र्यांचा जोरदार फटका बसून मृत्यू झाला.

जळगाव शहरातील मेहरूण परिसरात वीज कोसळल्याने संतोष तायडे यांच्या गायीचा मृत्यू झाला. झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही घरांची पत्रे उडून गेल्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.

वादळामुळे जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, तर शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि आपत्ती व्यवस्थापनाचे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी रात्रीच नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी महापालिका, महावितरण, वाहतूक पोलिस व संबंधित यंत्रणांना तात्काळ मदतकार्य राबवण्याचे आदेश दिले. परिणामी, मध्यरात्रीनंतर वाहतूक व काही भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

प्रशासनातर्फे गुरुवारी सकाळपासून वादळामुळे झालेल्या एकूण नुकसानीचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठीही वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button