Politics

मोदी-मोदी-मोदी.. जळगावात घुमला तरुणाईचा आवाज, वाचा काय म्हणाले अमित शहा..

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी ही निवडणूक आहे असा गैरसमज काढून टाका. २०४७ मध्ये भारताला महासत्ता बनविण्यासाठी ही निवडणूक आहे. यंदाची निवडणूक भारताच्या युवकांची निवडणूक आहे. भाजपला मतदान म्हणजे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे. भारत मातेला विश्र्वगुरू बनविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि लोकशाही मजबूत करणाऱ्या पक्षाला मतदान करा. सोनिया गांधींना राहुल गांधीला पंतप्रधान बनवायचे आहे, उध्दव ठाकरेंना मुलाला, शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे. आपल्यासाठी कुणी असेल तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांनी सांगितले.

जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर मंगळवार दि.५ मार्च रोजी युवा संमेलन आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन पार पडले. प्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा.उन्मेष पाटील, खा.रक्षा खडसे, मंत्री ना.गिरीश महाजन, मंत्री गावीत, आ.जयकुमार रावल, आ.सुरेश भोळे, आ.मंगेश चव्हाण, आ.संजय सावकारे आदींसह इतर मान्यवर उपस्थित आहेत.

अमित शहा पुढे म्हणाले की, मनमोहन सरकार असताना आपण मागे पळून यायचो मोदी सरकार आल्यावर घरात घुसून प्रतिहल्ला करायला लागलो. काँग्रेसने कलम ३७० ला ७० वर्ष लागू केले, मोदींनी ते हटवून काश्मीरला भारताचा भाग केला, असे शहा म्हणाले. मोदींनी देशाला सुरक्षीत करायचे काम केले आहे. मोदींनी दहा वर्षात भारताची अर्थव्यवस्था १० क्रमांकावरून ५ वर आणली आहे. तिसऱ्यांदा मोदींच्या हातात सत्ता द्या भारताची अर्थव्यवस्था ३ ऱ्या क्रमांकावर आणून ठेवतील ही मोदींची गँरंटी आहे. मोदींनी युवकांसाठी गेल्या १० वर्षात खूप काही केले आहे. नवीन महाविद्यालये उघडले, नवीन स्टार्ट अपला चालना दिली, मुद्रा लोन उपलब्ध करून दिले आहे. मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर बांधला, रामलल्लाला बाहेर काढून राम मंदिर उभारले. मुलींनो तयारी करून ठेवा ३३ टक्के आरक्षण तुमच्यासाठी आहे.

ना.अमित शहा पुढे म्हणाले की, मोदी भविष्यातील भारतासाठी तयार आहेत. भारताला मोठी अर्थव्यवस्था बनविणे, अंतराळ स्टेशन स्थापित करणे, ओलंपिक सामने भरविणे, चंद्रावर पाऊल ठेवणे असे सर्व प्रस्तावित आहे. महाराष्ट्रात तीन चाकांची गाडी चालते, तिन्ही चाके पंक्चर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास झाला आहे. पुढील तीस वर्षात दरवर्षी १ लाख मुले डॉक्टर होऊन देशाच्या सेवेसाठी तत्पर असतील. महाभारताची रचना करण्याचे मोदींनी निश्चित केले आहे. मोदींना ३०० पेक्षा अधिक, महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक आणि देशात ४०० पेक्षा अधिक जागा निवडून आणायच्या असा निर्धार करा, असे शहा यांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मोदी की गॅरंटी म्हणजे विश्वासाचा आवाज आहे. प्रत्येकाने नमो ॲप डाऊनलोड करावे. मोदींच्या नेतृत्वात भारताला आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली. चंद्रावर देशाचे पाऊल पडले. मी मोदींना फॉलो करेल असे आजचा युवक सांगतो. २०२४ मे उत्तर महाराष्ट्रात सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खान्देशच्या तरुणाईला साद घालण्यासाठी आणि दिशा दाखविण्यासाठी आजचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. १० वर्ष देशात मोदींनी परिवर्तन करून दाखविले. ‘गरीबी हटाव’चा नारा इंदिराजी, सोनियाजी आणि राहुल गांधी यांनी दिला मात्र २५ कोटी पेक्षा अधिक लोकांना गरिबीच्या बाहेर काढण्याचे काम मोदींनी केले. मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था केली. गरिबांचा विकास करून देखील अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते हे मोदींनी दाखवले. काळा पैसा गरिबांच्या कल्याणासाठी लावण्याचे काम मोदींनी केले. भारताची अर्थव्यवस्था जगात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याचे काम मोदी करणार आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेला कुणीही थांबवू शकत नाही. पुढील पाच वर्ष आपल्याला मोदींना सरकार द्यायचे आहे, भाजपला मतदान करायचे आहे. मोदींच्या मागे सर्वांना उभे राहायचे आहे, अशी विनंती ना.देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button