Politics

जयंत पाटलांचा राजीनाम्याचा संकेत; “नव्या चेहऱ्यांना संधी द्या”, पवारांना खुलं आवाहन

जयंत पाटलांचा राजीनाम्याचा संकेत; “नव्या चेहऱ्यांना संधी द्या”, पवारांना खुलं आवाहन

पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर टोला लगावत आणि पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करत आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत दिले. त्यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले.

अभी भी पवार साहब का डर बाकी है” – पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

भाषणाची दमदार सुरुवात करत जयंत पाटील म्हणाले, “अभी भी पवार साहब का डर बाकी है!” असा शेरा मारून त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे टाळ्या-गजरात लक्ष वेधले. त्यांनी या वक्तव्यातून शरद पवार यांचा प्रभाव आजही कायम असल्याचे अधोरेखित करत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

नव्या नेतृत्वाला संधी द्या” – पाटील यांचे पवारांना खुले आवाहन

भाषणाच्या उत्तरार्धात जयंत पाटील म्हणाले, “मला पवार साहेबांनी सात वर्ष संधी दिली, आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. शेवटी हा पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी यावर योग्य निर्णय घ्यावा.” त्यांच्या या विधानावरून त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शविल्याचे संकेत मिळाले.

“ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम” – वैचारिक संघर्षाची घोषणा

देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत पाटील म्हणाले, “आम्ही तुकाराम महाराजांच्या विचारांचे समर्थक आहोत. आता ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी – या भूमिकेतून आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत.” त्यांनी कार्यकर्त्यांना नवचैतन्याचा संदेश दिला.

शिष्टमंडळावर भाष्य; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचे कौतुक

ऑपरेशन सिंधूर प्रकरणावरही त्यांनी मत मांडले. त्यांनी “सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जागतिक स्तरावर भारताची भक्कम बाजू मांडली,” असे म्हणत पक्षाच्या राष्ट्रीय भूमिकेचे समर्थन केले.

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; जयंत पाटील थांबले ‘त्या’ वाक्यावर

जयंत पाटील यांनी “नव्या चेहऱ्यांना संधी द्या” असे म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता व गोंधळ उडाला. “नाही, नाही!” अशा प्रतिक्रिया ऐकू आल्या. मात्र, पाटलांनी शांतपणे शेवट करत म्हणाले, “शेवटी हा पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे.”

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button