जळगावच्या रस्त्यांसाठी पुन्हा शंभर कोटींचा निधी – ना. गिरीश महाजन

जळगावच्या रस्त्यांसाठी पुन्हा शंभर कोटींचा निधी – ना. गिरीश महाजन
चार महिन्यात रस्त्यांचे काम पूर्ण; टेक्स्टाईल पार्कमुळे रोजगाराच्या संधी वाढणार
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील रस्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणखी १०० कोटी रुपये मंजूर केले असून, आगामी चार महिन्यांत रस्त्यांची कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
जी. एम. फाउंडेशन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, प्रदेश संघटनमंत्री विजय चौधरी, डॉ. राधेश्याम चौधरी, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.
शहरात विकासकामांना गती
महाजन म्हणाले की, जळगावच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब होती. यापूर्वीही मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने काही रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, आठ दिवसांत तो उपलब्ध होईल. सर्व रस्त्यांची कामे चार महिन्यांत पूर्ण होतील.
‘टी’ आकाराच्या पूलाला गती
शिवाजीनगरमधील ‘टी’ आकाराच्या पूल प्रकल्पासाठीही निधी मंजूर झाला असून, नागरिकांमध्ये मतभेद आहेत. दोन्ही बाजूंच्या नागरिकांशी चर्चा करून लवकरच या पूलाचे काम सुरू करण्यात येईल, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
टेक्स्टाईल पार्कमुळे रोजगार
जामनेर येथे उभारण्यात येणाऱ्या टेक्स्टाईल पार्क बाबत सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, पुढील महिन्याभरात येथे पहिला प्रकल्प सुरू होणार आहे. सुरुवातीला जमिनीच्या किमतींमुळे अडथळे होते, मात्र आता दर ५० टक्क्यांनी कमी केल्यामुळे अनेक नामांकित उद्योग समूह येथे येण्यास तयार आहेत. परिणामी, स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी अनेक योजना
महाजन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना नियमित खते, बियाणे मिळत असून, उत्पादनात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर २,५०० रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. लवकरच ही रक्कम २,१०० रुपये प्रतिमहिना केली जाणार आहे. कर्जमाफीही निश्चित असून, त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘गरीबी हटाव’ नव्हे, समुळ उच्चाटन
महाजन यांनी काँग्रेसवर टीका करताना सांगितले की, ‘गरीबी हटाव’ हे घोषवाक्य फक्त घोषणाच राहिली. प्रत्यक्षात मोदी सरकारने मोफत धान्य, उज्ज्वला गॅस, शौचालय योजना, जनधन खाते अशा विविध योजनांद्वारे गरीबांसाठी मोठे कार्य केले. देशातून गरीबीचे समूळ उच्चाटन हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.