OtherMaharashtraSocial

अयोध्या अपघातानंतर जळगाव–धुळेचे भाविक सुरक्षित परतले

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्याचे कौतुक : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश 

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अयोध्या–प्रयागराज महामार्गावर झालेल्या अपघातानंतर जखमी आणि अडचणीत सापडलेल्या जळगाव व धुळे जिल्ह्यातील भाविकांना दिलासा देत जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतकार्य उभारले होते. या सर्व भाविकांना सुरक्षित परतीसाठी स्वतंत्र राखीव बोगीची व्यवस्था करून लखनऊ–एल टी टी (गाडी क्रमांक ०१०१६) मार्गे जळगावात सुखरूप परत आणण्यात आले. आज सायंकाळी ६.३० वाजता सर्व भाविक जळगावात पोहोचले असून त्यांनी प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तातडीच्या निर्देशानुसार हे संपूर्ण मदतकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. जिल्हा प्रशासन, सुलतानपूर प्रशासन, लखनऊ व भुसावळ रेल्वे विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त समन्वयातून भाविकांसाठी निवास, भोजन, प्राथमिक उपचार आणि प्रवासाची योग्य व्यवस्था करण्यात आली.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी संपूर्ण कार्य कुशलतेने पार पाडले.

दरम्यान, अपघातात पिंप्राळा (जळगाव) येथील छोटीबाई शरद पाटील (वय ५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह प्रशासनाने तत्काळ ॲम्बुलन्सद्वारे जळगावला आणून नातेवाइकांच्या ताब्यात सुपूर्द केला.

एकूण ४३ भाविक सुखरूप परतले असून त्यात दोन धुळे, एक नाशिक आणि एक पुणे येथील भाविकांचा समावेश आहे. उर्वरित भाविक धरणगाव, एरंडोल, पाचोरा, भुसावळ, यावल, पारोळा आणि वरणगाव या जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतील आहेत.

जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचताच निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रशासनाच्या वतीने सर्वांचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार (धरणगाव) महेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, रेल्वे विभागाचे अधिकारी व भाविकांचे नातेवाईक उपस्थित होते.

भाविकांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन सतत संपर्कात राहून मदत करत आहे. रेल्वे स्थानकावरून सर्व भाविक आपल्या नातेवाइकांसमवेत निवासस्थानाकडे रवाना झाले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button