तांबापुरा भागातून १३ वर्षीय मुलाचे अपहरण !

तांबापुरा भागातून १३ वर्षीय मुलाचे अपहरण !
एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) : तांबापुरा परिसरातील बिस्मिल्ला चौक येथून १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा जावेद इरफान काकर हा 11 जून रोजी सकाळी नऊ वाजेपासून खेळायला जातो असे सांगून गेला होता. मात्र दुपार झाली तरीही तो घरी न आल्याने पालकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावेद इरफान काकर (वय १३ वर्षे ) हा बिस्मिल्ला चौक, तांबापुरा येथे वडील इरफान काकर (वय ४५, व्यवसाय – हातमजुरी), आई व दोन बहिणींसह वास्तव्यास आहे. तो महापालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक ४१ मध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत आहे.
११ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास जावेदने आईच्या सांगण्यावरून टोस्ट आणण्यासाठी दुकानात जाऊन टोस्ट आणले. त्यानंतर घरच्यांसह चहा-नाश्ता घेतल्यानंतर “मी खेळायला जातो,” असे सांगून तो सकाळी ९ वाजता घराबाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही.
दुपारी १ वाजेपर्यंत जावेद जेवणासाठी न आल्याने पालकांनी आजूबाजूला व परिसरात शोधाशोध सुरू केली. तांबापुरा, मेहरूण, बसस्टँड, रेल्वे स्टेशन परिसर, तसेच नातेवाईकांकडे विचारणा करण्यात आली. मात्र, कुठेही माहिती न मिळाल्याने शेवटी वडील इरफान काकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
अज्ञात व्यक्तीने मुलाला फूस लावून पळवून नेले असावा, असा संशय वडिलांनी व्यक्त केला असून, त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.