Other

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश ; एकही शेतकरी

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश ; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका

जळगाव, प्रतिनिधी: खरीप हंगाम २०२६ यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने मिशन मोडवर कामे करावीत. बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून तत्काळ गुन्हे दाखल करावेत. एकही शेतकरी बियाणे, खत व पीककर्जापासून वंचित राहू देऊ नका, असे स्पष्ट निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत ढवरे, यावल विभागाचे उपवनसंरक्षक सौरीश सहाय , जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जिल्हा परिषद कृषी अधिकारी पदमनाभ म्हस्के,कृषी विभागाचे अधिकारी, खत विक्रेते असोसिएशन अध्यक्ष विनोद तराळ उपस्थित होते. तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाशी संबंधित संस्थांचे पदाधिकारी, वीज वितरण,बँक, संबंधित विभागांचे अधिकारी व प्रगतशील शेतकरी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचे आवाहन
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये. किमान १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कमी कालावधीतील वाण, आंतरपिक पद्धती आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यासाठी कृषी विभागाने गावागावात जनजागृती मोहीम राबवावी. डीएपी खताची मागणी वाढत असल्याने एसएसपीसारख्या पर्यायी खतांचा वापर वाढवावा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४० हजार ५३६ हेक्टर असून यंदा ४ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र कापूस पिकाखाली प्रस्तावित आहे. खरीपासाठी आवश्यक २२ लाख १० हजार कापूस बियाणे पाकिटांचा पुरेसा साठा उपलब्ध असून आतापर्यंत ४ लाख ५६ हजार ५३ पाकिटे उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
बोगस निविष्ठांविरोधात प्रशासनाने अधिक सतर्क राहावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. अप्रमाणित खत विक्रीप्रकरणी दोन पोलीस गुन्हे दाखल करण्यात आले असून ५.४७ मेट्रिक टन खतसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच चोपडा व एरंडोल येथे बनावट एचटीबीटी बियाण्यांप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून १० लाख २० हजार रुपये किंमतीची ८५० पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यात भरारी पथके नियुक्त करून शेतकऱ्यांना बियाणे व खतांची अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ कार्यवाही करून तक्रारींचे निरसन करावे, असे निर्देश त्यांनी कृषी विभागाला दिले. महावितरण विभागाला खरीप हंगामात अखंडित वीजपुरवठा देण्याचे निर्देश देत नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी सर्व पूर्वतयारी पूर्ण करण्यास सांगण्यात आले.बँका व वित्तीय संस्थांनी पीककर्ज वितरण वेळेत पूर्ण करावे. शेतकऱ्यांना कर्जासाठी वारंवार बँकांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत. शासनाच्या योजनांमधून मिळणारा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर वसूल करू नये, अशा स्पष्ट सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

बैठकीच्या शेवटी *“काम वेळेत करा, शेतकऱ्यांना फिरवू नका आणि निर्णय तात्काळ घ्या,”* अशा सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, असे सांगितले. मत्स्यउत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबवून आवश्यक उपाययोजना कराव्यात. यंदा पाऊस उशिरा होण्याची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शेतीसाठी आवश्यक पाण्याचे नियोजनही प्रभावीपणे करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पुरेसे खत उपलब्ध राहील यासाठीही दक्षता घेण्यास सांगितले.

वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे आवाहन
वस्रोद्योग मंत्री यांनी शेतकऱ्यांना तुती पिकांची लागवड करण्याचे आवाहन केले. तुती हे नगदी पीक असून त्याला चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे तुती लागवड शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात कृषी विभागाने तालुका स्तरावर बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच तीव्र उन्हाळ्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी व नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. याकडे वीज वितरण विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

विमोचन व अन्य माहिती
बैठकीच्या सुरुवातीला कृषी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या क्यूआर कोडयुक्त घडीपत्रिकांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यामध्ये कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी, बीटी कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन तसेच खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहितीचा समावेश होता.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रशासनातर्फे खरीप हंगामासाठी सुरू असलेल्या तयारीची तसेच तुती लागवड आणि उत्पादनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

प्रास्ताविकात जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांनी खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा सादर केला.

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५७२४ अवजारांसाठी ३७ कोटी ९० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत २३ शेतकरी उत्पादन कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून २२७७ लाख रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ८६ हजार ५१२ शेतकऱ्यांना ६४५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३१९ गावांची निवड करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेत १२२८ प्रकल्प मंजूर झाले असून जिल्ह्यात १३५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
जिल्ह्यासाठी ३ लाख ६५ हजार ८०० मेट्रिक टन खत आवंटित करण्यात आले असून सध्या १ लाख ६५ हजार ५५९ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button