Train Accident : कलेक्टर, एसपींनी ‘अशी’ हाताळली परिस्थिती!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात १२ प्रवाशांना जीव गमवावा लागला. सर्व नियमीत सुरू असताना अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाताना जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी नियोजन करून सर्व उपाययोजना केल्या. सर्व विभागांशी समन्वय ठेवल्याने अवघ्या काही तासात परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे तसेच पुढील व्यवस्था करणे शक्य झाले.
पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशनजवळ बुधवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी पुष्पक एक्सप्रेस पाचोऱ्याच्या दिशेने येत असताना ४.४५ वाजेच्या सुमारास रेल्वेत आग लागल्याची चर्चा पसरली. आगीच्या भीतीने प्रवाशी पुष्पक एक्सप्रेसमधून खाली उतरले. परंतु समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवले. या घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १५ प्रवासी जखमी झाले. जिल्हा प्रशासनाला घटनेबद्दल माहिती मिळताच सर्वप्रथम जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पुढील नियोजन आखले.
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीतच केल्या १०८ रुग्णवाहिकेसाठी सूचना
परधाडे येथे ४.४७ च्या सुमारास अपघात झाला. रेल्वेच्या मध्य आणि भुसावळ विभागाकडून ५ वाजता जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांना सूचना प्राप्त झाली. नेमके तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्वाची बैठक सुरू होती. बैठकीत आरोग्य विभागाचे अधिकारी आणि १०८ रुग्णवाहिकेचे प्रमुख उपस्थित होते. गुगल मॅपद्वारे घटनास्थळाची माहिती घेत पाचोरा प्रांताधिकारी, तहसीलदार यांना त्यांनी तत्काळ रवाना केले. अंदाजे २० प्रवासी मयत असल्याची प्राथमिक माहिती येत असल्याने परिसरात असलेल्या ५ रुग्णवाहिका तिथे पाठवण्यात आल्या. तसेच आणखी ३ अशा एकूण ८ रुग्णवाहिका काही मिनिटात घटनास्थळी पोहचल्या.
गृह विभाग, माध्यमांना पोहचवली अचूक माहिती
सुरुवातीला अपघातात ४० ते ५० प्रवासी मृत झाल्याची माहिती समोर येत होती तसेच काही माध्यमातून आणि सोशल मीडियात देखील असे मेसेज व्हायरल होत होते. गृह विभाग, मुख्यमंत्री आणि इतर मंत्री महोदय माहिती विचारत होते. ५ वाजून २६ मिनिटांनी प्रांताधिकारी घटनास्थळी पोहचले. रुळावर असलेल्या मृतदेहांचा अंदाज घेत ६-७ लोक मयत असल्याची माहिती त्यांनी कळवली. माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांनी सर्व माहिती वरिष्ठांना आणि माध्यमांना दिली. त्यामुळेच नेमके मृत्यू किती यांचा अंदाज आला.
जखमींच्या उपचारार्थ यंत्रणा केली अलर्ट
अपघातातील जखमींना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देताना पाचोरा केवळ १५ किलोमीटर असल्याने तेथील ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय सज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. एका रुग्णालयात केवळ ५ जखमींना उपचारांसाठी दाखल करावे असे त्यांनी सुचविले. जिल्हाधिकारी आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे पथक पाचोरा येथे पोहोचले. ३ गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ रेल्वेचा करार असल्याने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
घटनास्थळी पोहचवली मदत, माहितीसाठी AI चा उपयोग
अपघाताची तीव्रता लक्षात घेत त्याठिकाणी गॅस कटर, अतिरिक्त लाईट व्यवस्था पाठवण्यात आली. आगीची माहिती असल्याने पाचोरा स्थानकावर अग्निशमन दलाचा बंब तैनात करण्यात आला होता. मयतांची माहिती संकलीत करून त्याचा टेबल तयार करणे, वेगवेगळ्या भाषेत भाषांतर करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. दोन्ही रेल्वे रवाना करून मयतांच्या नातेवाईकांची मुक्काम आणि जेवणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली.
एका दिवसात मृत्यू दाखले, आर्थिक मदत, रुग्णवाहिकेची व्यवस्था
मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारने ५ लाखांची तर रेल्वे प्रशासनाने दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली. तत्काळ मदत मिळावी यासाठी सर्व माहिती संकलीत करून मनपातून १ दिवसात मृत्यू दाखले देण्यात आले. रेल्वेकडून ५० हजार रोख स्वरूपात मदत मिळाली. मृतदेह राज्याबाहेर पाठवायचे असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाची परवानगी आवश्यक असते. जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांनी लागलीच मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्वतःच्या जि.एम.फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह घरी पोहचवण्याची जबाबदारी घेतली.
पोलीस प्रशासन सर्वात अगोदर पोहचले घटनास्थळी
साधारणतः ५ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना अपघाताची माहिती मिळाली. पाचोरा आणि परिसरातील सर्व बीट चौकीला सूचना देत त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेण्याचे सांगितले. स्वतः अधीक्षक देखील तत्काळ रवाना झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पाचोरा पोलिसांनी मयत व्यक्तींचे शरीर आणि अवयव कपडे आणि झाडाच्या पाल्याने झाकून ठेवले. मयतांचा आकडा जास्त येत असल्याने आणि आजूबाजूचे ग्रामस्थ देखील तिथे जमलेले होते म्हणून पोलीस अधीक्षक आरसीपीची तुकडी सोबत घेऊन गेले. ५.३० च्या सुमारास पोलीस अधीक्षक तिथे पोहोचले. तोवर रेल्वेचे देखील काही अधिकारी आलेले होते.
ग्रामस्थांची मदत घेऊन मृतदेह जळगाव आणले
घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे पोहचले तेव्हा अंदाजे ४०० ते ५०० चा जमाव रेल्वे रुळावर जमलेला होता. पोलीस येताच ग्रामस्थ पळू लागले असता पोलीस अधीक्षकांनी त्यांना थांबवले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शाल, चादर, मोठे कापड शोधून मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवण्यास पोलीस अधिक्षकांनी सांगितले. सर्व मृतदेह ३ रुग्णवाहिकेत ठेवून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी जळगावच्या दिशेने रवाना झाले. अगोदर वाहतूक विभागाला सूचना केलेल्या असल्याने रस्ता देखील मोकळा करण्यात आला होता.
जळगाव रेल्वे स्थानक, रुग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात
घटना मोठी असल्याने आणि जखमी, मयताचे नातेवाईक कर्नाटक एक्सप्रेसने जळगाव येत असल्याची माहिती होती, त्यामुळे पोलीस अधिक्षकांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जळगाव रेल्वे स्थानकावर पाठवले. दुसरीकडे जळगाव जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी जमलेली होती. नातेवाईक आणि जखमी आल्यावर कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक मृतदेह घेऊन पोहचताच लागलीच मृतदेह शवविच्छेदन गृहात हलवण्यात आले.
तात्काळ पंचनामे करून पार पाडली कागदोपत्री प्रक्रिया
सर्व मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात आणल्यावर लागलीच मयताच्या नातेवाईकांचा शोध घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे भरून घेण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली. घटनास्थळी असलेले मृतदेहाचे अवशेष जमा करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी सूचना केल्या. रात्री उशिरापर्यंत सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा रुग्णालयात थांबून होते. तसेच घटनेची सर्व माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी वेळोवेळी वरिष्ठांना कळवली.