
जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील सुंदरमोती नगरात राहणाऱ्या आणि बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी येथील माहेर असलेल्या २३ वर्षीय मयुरी गौरव ठोसर हिने कौटुंबिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी १० मे २०२५ रोजी गौरव ठोसर याच्याशी लग्न झालेल्या मयुरीने १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे तिच्या माहेरच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला असून, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
मयुरीचा विवाह १० मे २०२५ रोजी जळगावच्या गौरव ठोसर यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. छोट्या-छोट्या गोष्टींवरून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. इतकेच नव्हे, तर तिच्याकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. मयुरीचा पती गौरव ठोसर हादेखील तिला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून मयुरीने आपल्या आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली होती. त्यांनी पैशांची मदत करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही दिवसांनंतर पुन्हा छळ सुरू झाला.
मयुरीचा ९ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता आणि तिच्या भावाने तिला पैसे पाठवून तो साजरा केला होता. मात्र, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी, १० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घरात एकटी असताना मयुरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर तिला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
:
या घटनेची माहिती मिळताच मयुरीचे वडील भगवान बुडूकले कुटुंबीयांसह ११ सप्टेंबर रोजी जळगावात दाखल झाले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मयुरीची आई, वडील आणि भाऊ यांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांनी मयुरीचा पती गौरव ठोसर, सासू-सासरा, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली .






