आपल्यात क्षमता असेल तरच शांतता समितीचे सदस्य व्हा : डॉ.आयुष प्रसाद

महा पोलीस न्यूज । दि.२५ मार्च २०२५ । जळगाव पोलीस दलाचे काम खुप उल्लेखनीय आहे. पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव असताना देखील ते आपले कार्य उत्तमरित्या करीत आहेत. दंगल घडवायला जो कुणी नियोजन करीत असेल त्याला रोखण्याची जबाबदारी शांतता समिती सदस्यांवर असते. ज्यांचा समाजात काही दबदबा आहे अशा सदस्यांचा शांतता समितीत समावेश करण्यात यावा. जमावाला रोखणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. समाजातील आणि परिसरातील सर्व इत्यंभूत माहिती आपल्याला असावी, या सर्व बाबी करण्याची क्षमता आपल्यात असेल तर तुम्ही शांतता समिती सदस्य व्हावे, असे जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांनी सांगितले.
जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे रमजान ईद, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जळगाव अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि जळगावातील सर्व समाजाचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
भांडण रोखायला कॅमेऱ्यांची नव्हे तर मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. समाजात अज्ञानता फार पसरली आहे. महापुरुषांचे पुतळे आपण निकृष्ट दर्जाचे, अतिक्रमण करून आणि लपून लावतो, माझ्यामते हा महापुरुषांचा सर्वात मोठा अपमान आहे. जगात काहीही होत असले तरी आपण सर्व जळगावात सर्व समाजात शांतता ठेवू, विकास करू असे जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांनी सांगितले.
सध्या सोशल मीडिया सर्वात मोठी अडचण : डॉ.महेश्वर रेड्डी
सध्या सोशल मीडिया सर्वात मोठी अडचण ठरत आहे. कुणीही काहीतरी स्टेटस ठेवतो आणि त्यामुळे वाद निर्माण होतो. त्यात १५ ते २५ वयोगटातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. त्या मुलांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. सोशल मीडियात काही आक्षेपार्ह पोस्ट आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यायला हवी. पोलिसांना वेळीच माहिती मिळाली तर पुढील घटना टाळता येतात. मिरवणुकीचे मार्ग बदलण्यात येणार नाही. डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजवल्यास कारवाई करण्यात येईल. लाउड स्पीकर लावायचे असल्यास परवानगी घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे सर्वांनी पालन करावे. सर्वांनी सायबर फसवणुकीबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. कोणीही अनोळखी व्यक्ती धमकी देत असेल तर त्याला घाबरू नये. असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी म्हणाले.
समिती सदस्यांनी मांडल्या विविध सूचना
सोशल मीडिया ग्रुपवर येणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टची माहिती पोलिसांना देण्यात यावी, डीपीडीसीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, ११ एप्रिल रोजी महात्मा फुले मार्केट आणि १४ एप्रिलच्या अगोदर जळगाव शहरातील मिरवणुकीचा मुख्य रस्ता अतिक्रमण मुक्त करावा, शांतता कमिटीमध्ये मीडिया प्रतिनिधींचा समावेश करावा, अशा सूचना नागरिकांनी मांडल्या.
शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वाटप
कार्यक्रम संपल्यावर उपस्थित सर्व शांतता समिती सदस्यांना जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून हेल्मेट वितरीत करण्यात आले. वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्तावित उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी तर आभार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी मानले.