
महा पोलीस न्यूज । सुभाष धाडे । ऐन उन्हाळ्यात जंगलातील वन्यजीव पाण्याच्या एका थेंबासाठी व्याकूळ झाले असून, शासन व वनविभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक कृत्रिम पाणवठे कोरडेठाक पडल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. तापमानाने ४५ ते ४६ अंशांचा टप्पा गाठलेला असताना जंगलातील वन्यप्राण्यांची तहानेने अक्षरशः लाही-लाही होत आहे.
तालुक्यातील पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मुक्ताई भवानी व्याघ्र अधिवास क्षेत्रात’ (वढोदा वनक्षेत्र) मागील वर्षी उभारण्यात आलेल्या सुमारे ८१ कृत्रिम पाणवठ्यांपैकी बहुतांश पाणवठे सध्या कोरडे पडले आहेत. तसेच मुक्ताईनगर वनक्षेत्रातील ३१ पाणवठ्यांपैकी अनेक ठिकाणी पाण्याचा थेंबही नसल्याची धक्कादायक स्थिती आहे.
वनविभागाकडून जंगलातील विविध भागांत सिमेंट तसेच फायबरचे रेडिमेड पाणवठे तयार करण्यात आले होते. या पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था असतानाही, यंदा जिल्हा नियोजन निधीतून वेळेत निधी उपलब्ध न झाल्याने वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था कोलमडल्याचे समजते. परिणामी बिबट्या, हरिण, रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांना पाण्यासाठी जंगलाबाहेर मानवी वस्तीकडे जीव धोक्यात घालून भटकावे लागत आहे.
जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आधीच आटलेले आहेत. जमिनीतील जलपातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने वन्यजीवांसाठी पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. वन्यप्रेमी आणि नागरिकांमध्ये या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शासनाच्या वन्यजीव संवर्धनाच्या घोषणा फक्त कागदावरच असल्याची टीका होत आहे.
दरम्यान, वडोदा वनक्षेत्रातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि वनप्रेमींनी स्वखर्चातून तसेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त मदतीच्या माध्यमातून काही पाणवठ्यांमध्ये पाणी भरल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय काही वन व्यवस्थापन समित्यांमध्ये शिल्लक असलेल्या निधीतूनही अत्यावश्यक भागातील काही पाणवठे भरले जात असल्याचे समजते.
विशेष म्हणजे वाघ, बिबट्या आणि विविध तृणभक्षक प्राण्यांनी समृद्ध असलेल्या मुक्ताईनगरच्या जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्याच जंगलातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. तालुक्याला दोन वनक्षेत्रांचा लाभ असूनही आणि केंद्रीय मंत्री तसेच दोन प्रभावी आमदारांचे नेतृत्व असतानाही वनसंवर्धनाकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
मागील महिन्यात पाण्याच्या शोधात एक बिबट्या थेट मुक्ताईनगरातील मध्यवर्ती विश्रामगृह परिसरात शिरल्याची घटना घडली होती. ही घटना वन्यजीवांच्या वाढत्या पाणीटंचाईची गंभीर चेतावणी मानली जात आहे.
एकीकडे वृक्षसंवर्धन आणि वन्यप्राणी संवर्धनाच्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात जंगलातील प्राणी तहानेने व्याकूळ होत असल्याचे चित्र अत्यंत वेदनादायी आहे. लोकप्रतिनिधींनी आणि वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन सर्व पाणवठे त्वरित भरावेत, अशी मागणी वन्यप्रेमींसह नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
शिल्लक रकमेतून पाणवठे भरतोय
“निधी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली होती. निधी उपलब्ध होताच पाणवठे नियमित भरण्यात येतील. काही वन समित्यांमधील शिल्लक रकमेतून अत्यावश्यक ठिकाणचे पाणवठे भरले जात आहेत. तसेच समाजातील अपेक्षित व्यक्तींना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.” – राम धोत्रे, उपवनसंरक्षक, जळगाव वनविभाग
सर्व पाणवठे भरले जातील
“काही पाणवठे भरले आहेत. निधीला मंजुरी मिळाली असून लवकरच पूर्ण क्षमतेने सर्व पाणवठे भरले जातील.” – कृपाली शिंदे, वनपरीक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर वनक्षेत्र






