ड्रग्सचा विळखा : लोकप्रतिनिधींनी मांडला मुद्दा तरीही वाढतेय ड्रग्स संस्कृती!
आ.एकनाथराव खडसेंनी केले गंभीर आरोप

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात एमडी ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थ बिनधास्तपणे विक्री केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी जळगावात लागोपाठ काही आत्महत्त्या झाल्यानंतर जिल्हा नियोजनाच्या बैठकीत आणि अधिवेशनात देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुद्दा मांडला होता. अंमली पदार्थाचा विषय अधिवेशनात होऊन देखील आजवर जिल्ह्याची परिस्थिती जैसे थे आहे. मुळात ड्रग्समाफियांची पाळेमुळे शोधून काढण्यात पोलीस प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत नसल्यानेच ड्रग्स संस्कृती वाढू लागली आहे.
नशेडी तरुणांची आत्महत्या
जळगाव जिल्ह्यात आणि विशेषतः जळगाव शहर आणि भुसावळ शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा गोरखधंदा सुरू आहे. शाळकरी विद्यार्थी आणि अनेक तरुण, तरुणी ड्रग्सच्या आहारी गेल्या आहे. अमली पदार्थाच्या सेवनातून गुन्हेगारी कारवाया वाढत असून गेल्या वर्षी भुसावळ येथे एका ड्रग्स पार्टीत तरुणीवर अत्याचार झाल्याची चर्चा जोरात रंगली होती. दबक्या आवाजात याची चर्चा सुरु असताना त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने ते प्रकरण दाबल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात आत्तापर्यंत अनेकांनी आपले जीवन संपविले असून त्यामागे ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थ सेवनामुळे आलेले नैराश्य देखील कारणीभूत असू शकते.
गुजरात, दक्षिणेतून जळगावात येतो माल
दक्षिणेतील तेलंगणा,कर्नाटक ,आंध्र प्रदेश या राज्यातून गांजा, ड्रग्स मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रमार्गे नाशिक,औरंगाबाद,जळगाव, नागपूर या शहरांमध्ये येतो. तसेच चरस हिमाचल प्रदेश,हरियाणा मधून आणले जाते. सर्व अंमली पदार्थ ठोक प्रमाणत आणि थेट मुंबई, पुणे पाठवणे धोक्याचे असल्याने जळगाव आणि परिसरातील जिल्ह्यातच त्याचाही विक्री केली जाते. जळगावात या गोरखधंद्यात रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. गांजा तर जळगाव जिल्ह्यासाठी काही नवीन राहिलेला नाही. सातपुडा पर्वतरांग आणि मध्यप्रदेशातून थेट जळगावात तो आणला जातो. बऱ्याचदा सर्व अंमली पदार्थ रेल्वे प्रवास करूनच जळगावात येतात.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी उठवला आवाज मात्र पुढे अनास्था
जळगाव जिल्ह्यातील ड्रग्स आणि अंमली पदार्थांच्या विषयावर आजवर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आणि अधिवेशनात स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुद्दे उपस्थित केले होते. जळगावात देखील डीपीसी बैठकीत आ.सुरेश भोळे यांनी आवाज उठवला होता मात्र त्यानंतर काहीही ठोस पाऊले उचलण्यात आली नाही. जळगाव जिल्ह्यात १ केंद्रीय राज्य मंत्री, ३ मंत्री असताना देखील कुणीही या विषयावर बोलायला आणि आवाज उठवायला पुढे येत नाही यावरून राजकीय अनास्था दिसून येते.
केंद्रीय गृह मंत्र्यांनी दिला इशारा
केंद्र सरकार अंमली पदार्थांच्या तस्करांना शिक्षा करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार “ड्रग-मुक्त भारत” निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. पैशाच्या हव्यासापोटी युवकांना व्यसनाच्या अंधाराच्या खाईत ढकलणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांना शिक्षा करण्याबाबत मोदी सरकार कठोर आहे. अंमली पदार्थ मुक्त भारताच्या निर्मितीसाठी सरकार निष्पक्ष आणि दक्ष तपासणीसह अंमली पदार्थांच्या संकटाचा सामना करत राहण्यासाठी कटिबद्ध आहे, असे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच केले. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या निवेदनावर राज्य सरकार कशी पाऊले उचलणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
पोलिसांच्या हफ्तेखोरीमुळे वाढतेय विक्री : आ.एकनाथराव खडसे
ड्रग्स आणि अंमली पदार्थांचे लोन खेडोपाडी देखील येऊन पोहचले आहे. जिल्ह्यातील पोलिसांना याबाबत माहिती आहे मात्र ते ठोस पाऊले उचलत नाही. अंमली पदार्थ विक्रेत्यांकडून पोलीस हफ्ते घेतात. एखादी कारवाई दाखवतात त्यात कुणाला तरी पकडतात मात्र मूळ म्होरक्यापर्यंत पोहचत नाही. लोकांचे संसार आणि मुले उध्वस्त झाले तर चालेल मात्र आपल्या पैशांचा ओलावा कमी होऊ नये अशी भूमिका असल्यानेच ड्रग्स आणि अंमली पदार्थ विक्रीचे प्रमाण वाढत असल्याचे आ.एकनाथराव खडसे यांनी ‘महा पोलीस न्यूज’सोबत बोलताना सांगितले.