२५ हरवलेले मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन

धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव पोलिसांनी जनतेचा विश्वास संपादन करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी हरवलेल्या ७२ मोबाईलपैकी २५ मोबाईल शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले.
आज धरणगाव पोलीस स्टेशन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात, चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या हस्ते या मोबाईलचे वितरण करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.
या कामगिरीत पोलीस हेडकॉन्स्टेबल चंदन पाटील आणि सुमित बाविस्कर यांनी अत्यंत कौशल्याने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व शोध कार्य करून हरवलेले मोबाईल शोधून काढले. मोबाईल हरवल्यानंतर बहुतांश वेळा ते परत मिळणे अशक्यप्राय मानले जाते, मात्र धरणगाव पोलिसांनी ही शक्यता खऱ्या अर्थाने सत्यात उतरवली आहे.