
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । प्रशासनातील महत्वाचा विभाग असलेल्या पोलीस दलातील पोलीस अधीक्षक कार्यालय सध्या व्हेंटिलेटरवर आहे. अवकाळी पावसाने शहरातील बत्ती गुल होऊ लागली आहे. बत्ती गुल होताच पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कामकाज ठप्प होत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयावर लावण्यात आलेले सोलर पॅनल देखील दीड वर्षापासून धूळखात आहेत. इतकंच नव्हे तर जनरेटर नादुरुस्त असून इन्व्हर्टर बॅटरीची क्षमता देखील संपली असल्याने संपूर्ण पोलीस अधीक्षक कार्यालयात अंधाराचे साम्राज्य असते.
जळगाव जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आठ दिवसापासून वादळीवाऱ्यासह पाऊस होत असल्याने तासनतास वीज पुरवठा खंडित होत असतो. बत्ती गुल झाली तरी कामकाजावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी सरकारी कार्यालयात पर्यायी व्यवस्था उपलब्ध असते. सोलर पॅनल, जनरेटर, इन्व्हर्टरच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरु ठेवत कामकाज केले जाते. जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात सध्या उलट चित्र पाहायला मिळत आहे.
सोलर पॅनल दीड वर्षापासून धूळखात
राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयात वीज पुरवठा करण्यासाठी आणि बिलाच्या बचतीसाठी काही वर्षापूर्वी सोलर पॅनल बसविले होते. जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयावर देखील याचप्रकारे दीड वर्षापूर्वी सोलर पॅनल बसवण्यात आले आहे. सोलर पॅनल लावल्यानंतर देखील अद्याप तो प्रकल्प सुरु करण्यात आलेला नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयाचे विद्युत बिल थकीत असल्याचे कारण देत पुढील कार्यवाही महावितरणकडून करण्यात येत नव्हती. महिन्यापूर्वी पोलीस प्रशासनाने सर्व बील अदा केले तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
जनरेटर नादुरुस्त, इन्व्हर्टर बॅटरी ढूस
पोलीस अधीक्षक कार्यालयात वीज पुरवठा खंडित झाल्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर देखील बसवण्यात आलेले आहे मात्र अनेक महिन्यांपासून ते देखील नादुरुस्त आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक विभागात इन्व्हर्टरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु बॅटरीची क्षमता पुरेशी नसल्याने वीज पुरवठा खंडित होताच सर्व कामकाज ठप्प होते. सर्व यंत्रणा ठप्प होत असल्याचे माहिती असून देखील त्यावर ठोस उपाययोजना तातडीने करण्यात आलेल्या नाही.
कार्यालयात अंधारात, कामकाज वाऱ्यावर
पोलीस अधीक्षक कार्यालयातील सध्याची स्थिती लक्षात घेता बत्ती गुल होताच ८० टक्के कार्यालयात अंधार पसरतो. जवळपास सर्वच संगणक आणि लाईट बंद होत असल्याने कामकाज ठप्प होते. परिणामी सर्व कर्मचारी देखील उकाड्यापासून दिलासा म्हणून बाहेर येऊन उभे राहतात. अनेकदा काही महत्वाची माहिती तातडीने नाशिक, मुंबई कार्यालयाला पाठवायची असते मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याने ती माहिती वेळेत पोहचत नाही. वरिष्ठांकडून विचारणा होत असल्याने त्यांना पावसाचे कारण द्यावे लागते.
सोलर पॅनल, जनरेटर संदर्भात केल्या सूचना
पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीवर बसविण्यात आलेल्या सोलर पॅनल बंद असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर महावितरणकडे संपर्क करण्यात आला. प्रलंबित वीज देयक देखील गेल्या महिन्यात अदा करण्यात आले आहे. मक्तेदार आणि महावितरणकडे पुढील पाठपुरावा करण्यात आला आहे. जनरेटर दुरुस्तीसंदर्भात देखील सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी महा पोलीस न्यूज सोबत बोलताना दिली आहे.