Crime

अंघोळीसाठी गेलेल्या पाच वर्षांच्या बालकासह महिलांचा डोहात बुडून मृत्यू

यावल तालुक्यातील अंजाळे येथील घटना

यावल | प्रतिनिधी ;- अंजाळे (ता. यावल) येथील तापी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या तिघांचा पाय घसरल्याने डोहात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत एका पाच वर्षांच्या चिमुकल्यासह दोन महिलांचा समावेश आहे.

मृतांमध्ये वैशाली सतीष भिल (वय २८) व त्यांचा मुलगा नकुल सतीष भिल (वय ५, दोघे रा. अंतुर्ली, ता. अमळनेर) आणि सपना गोपाल सोनवणे (वय २७, रा. पळाशी, ता. सोयगाव, जि. छ. संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

या तिघी अंजाळे येथील घाणेकर नगरमध्ये नातेवाइकांकडे गोंधळ कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर दुपारी सव्वा बारा वाजता त्या तापी नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेल्या. अंघोळ करताना पाय घसरल्याने त्या खोल पाण्यात बुडाल्या.

घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख, अर्षद गवळी, इस्तीयाक सय्यद, अनिल पाटील, उमेश महाजन हे देखील घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी डोहात बुडालेल्या तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह यावल ग्रामीण रुगणालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी शव विच्छेदन करीत मृतदेह रात्री आठ वाजता त्यांच्या कुटुंबाला सोपविल्यानंतर रात्री गावात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले एकाच वेळी तिघांचा, त्यातही एका चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button