जळगावात वीज मीटर बदलण्याच्या नावाखाली ५ हजारांची लाच घेताना वायरमन रंगेहात

महा पोलीस न्यूज । दि.१० जून २०२५ । जळगाव शहरात वीज मीटर बदलण्याच्या नावाखाली लाच घेणाऱ्या एका कंत्राटी वायरमनला अँन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) मंगळवारी रंगेहात पकडले. भूषण शालिग्राम चौधरी (वय ३७), असे या वायरमनचे नाव असून, तो महावितरणच्या प्रभात कॉलनी कक्षात कार्यरत आहे. त्याने एका ४६ वर्षीय नागरिकाकडून ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना सापळा कारवाईत अडकला.
एसीबीला मिळालेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार यांच्या घराचे वीज मीटर पूर्वीच्या मालकाच्या नावे होते. हे मीटर बदलण्यासाठी चौधरी तीन दिवसांपूर्वी तक्रारदार यांच्या घरी आला होता. त्याने मीटरचे सील तुटल्याचे सांगत तक्रारदारावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होण्याची भीती दाखवली. हा गुन्हा टाळण्यासाठी आणि मीटर टेस्टिंगचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी त्याने सुरुवातीला १५,००० रुपयांची मागणी केली. नंतर ५,००० रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने १० जून रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली.
एसीबीने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. मंगळवारी, १० जून २०२५ रोजी, चौधरीने तक्रारदाराकडून ५,००० रुपये स्वीकारताच पंचांसमोर त्याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत ५,००० रुपये जप्त करण्यात आले असून, हॅश व्हॅल्यू नोंदवण्यात आली आहे. चौधरीला ताब्यात घेण्यात आले असून, रामानंद नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९९८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईचे पर्यवेक्षण पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर (मो. ९७०२४३३१३१) यांनी केले, तर तपास अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी काम पाहिले. सापळा पथकात सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ सुनील वानखेडे आणि पोकाॅ अमोल सूर्यवंशी यांचा समावेश होता. मार्गदर्शन नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (मो. ९३७१९५७३९१) यांनी केले.
एसीबीने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने किंवा खासगी व्यक्तीने लाच मागितल्यास तात्काळ संपर्क साधावा. संपर्कासाठी: अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव (दूरध्वनी: ०२५७-२२३५४७७, मोबाइल: ९७०२४३३१३१, टोल फ्री: १०६४).