खरीप २०२४ पीक विमा नुकसान भरपाईसह बोदवडच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा

खरीप २०२४ पीक विमा नुकसान भरपाईसह बोदवडच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा
राष्ट्रवादी काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी
जळगाव : खरीप हंगाम २०२४ मध्ये जळगाव जिल्ह्यासह मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कापूस, मका आणि सोयाबीनसह विविध पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या या नुकसानीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी नोंदवून विमा प्रतिनिधींकडून क्षेत्र पाहणीही करून घेतली. मात्र, अद्याप पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा झालेली नाही. यासह बोदवड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी हवामान आधारित फळ पीक विमा योजनेतून शासनाच्या चुकीमुळे लाभापासून वंचित राहिले आहेत. या दोन्ही मुद्द्यांवर तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे , अशोक लाड वंजारी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामातील नुकसान भरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करावी. तसेच, बोदवड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेतून वगळल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी याबाबत ऑक्टोबर २०२४ मध्ये मुख्य सचिवांना पत्र लिहून शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून समाविष्ट करण्याची विनंती केली होती. केळी लागवड आता बारमाही झाल्याने विमा योजनेचे निकष बदलण्याची गरज असल्याचेही पक्षाने नमूद केले.राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळे तालुका कृषी कार्यालयाने सुधारित अहवाल तयार करून १ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाकडे पाठवला आहे. या अहवालात बोदवड तालुक्यातील केळी लागवड विमा योजनेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही, शासनाच्या गलथान कारभारामुळे बोदवडच्या चारही मंडलांतील शेतकरी लाभापासून वंचित आहेत. पक्षाने या चुका दुरुस्त करून शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा, पुढील काळात आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, याप्रकरणी शासनच जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.