
100 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनिक सुधारणा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या “100 दिवस सुधारणा उपक्रम” मध्ये जळगाव जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांचा मुंबई येथे विशेष गौरव करण्यात आला.
ही प्रशासकीय सुधारणा मोहीम राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणीसाठी राबविण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत महसूल प्रशासन, लोकसेवा वितरण, तांत्रिक साधनांचा वापर, जनसंपर्क व पारदर्शक कारभार या विविध निकषांवर जिल्ह्यांचे मूल्यमापन करण्यात आले. जळगाव जिल्ह्याने विविध क्षेत्रांतील कार्यक्षमता आणि जनतेपर्यंत सेवा पोहोचवण्यातील जलदगतीमुळे तिसरा क्रमांक पटकावला.
गौरव समारंभ प्रसंगी जळगावचे पालक सचिव आणि महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे सचिव व जिल्हाधिकारी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्याच्या कामगिरीचे कौतुक करत सांगितले की, “ही सुधारणा मोहीम प्रशासनाच्या उत्तरदायित्वाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे आणि जळगावचे मॉडेल इतर जिल्ह्यांनी अनुकरण करावे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जळगाव जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे अभिनंदन करत सांगितले की, “जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी प्रशासनाला गतिमान करत शासकीय सेवा थेट लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या आहेत.”
या यशामागे संपूर्ण जिल्हा प्रशासनाची टीम भावना, नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी आणि नागरिक केंद्रित दृष्टिकोन हे घटक ठरल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रसाद यांनी गौरवस्वरूप उत्तरात नमूद केले.