
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पाळधी येथील साईबाबा मंदिराकडे जाणारा महामार्गालगतचा प्रवेशमार्ग बंद करण्यात आल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. संबंधित मार्ग पूर्ववत सुरू करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा भाविक व परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.
पाळधी परिसरातील साईबाबा मंदिर हे जिल्ह्यासह राज्यातील आणि परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. दररोज तसेच विशेष धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरात गेल्या काही वर्षांत नागरी वस्तीही वाढली असून स्थानिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरला होता.
भाविकांच्या सोयीसाठी महामार्गावरून मंदिराकडे जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता उपलब्ध होता. मात्र, अलीकडे हा मार्ग बंद करण्यात आल्याने जळगावकडून येणाऱ्या भाविकांना मंदिरात पोहोचण्यासाठी सुमारे दोन किलोमीटर पुढे जाऊन वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांचा अतिरिक्त वेळ आणि इंधन खर्च वाढत असल्याची तक्रार व्यक्त केली जात आहे.
याच परिसरात प्रसिद्ध गणपती मंदिरही असून तेथे जाणाऱ्या भाविकांनाही आता मोठा फेरा मारून जावे लागत आहे. तसेच स्थानिक रहिवाशांच्या दैनंदिन वाहतुकीवरही याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन मार्ग पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. अन्यथा भाविक आणि स्थानिक रहिवासी एकत्रितपणे तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.





