शांताबाई’च्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ; चाळीसगावकरांमध्ये उत्सुकता

‘शांताबाई’च्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ; चाळीसगावकरांमध्ये उत्सुकता
चाळीसगाव: सोशल मीडियावर ‘शांताबाई’ नावाच्या अकाउंटने मोठा धुमाकूळ घातला असून, नागरिकांमध्ये या अकाउंटबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. शांताबाईच्या पोस्ट विविध विषयांवर थेट भाष्य करत असल्याने हे अकाउंट नेमकं कोण चालवतं, याची चर्चा सध्या शहरभर रंगली आहे.
शांताबाई म्हणजे कोण?
कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का? हे अकाउंट महिला चालवते की पुरुष? याचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. मात्र, सामान्य नागरिकांच्या मनातील प्रश्न, अडचणी, तसेच सरकारच्या अपयशावर थेट बोट ठेवणाऱ्या या पोस्ट लोकांमध्ये चांगल्याच गाजत आहेत.
सामान्य जनतेचा आवाज
शांताबाईच्या पोस्ट कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय केवळ जनतेच्या हितासाठी असल्याचा दावा केला जात आहे. शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण होत नसतील, सामान्य लोकांची दिशाभूल होत असेल, तर शांताबाई निर्भीडपणे सरकारला जाब विचारत आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील भावना मांडणाऱ्या या अकाउंटची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे
शांताबाईच्या टोकदार आणि थेट पोस्टमुळे राजकीय नेत्यांमध्येही खळबळ उडाली आहे. चुकीच्या आश्वासनांमुळे सामान्य जनता फसत आहे, हे मुद्दे उघड करत असल्याने हे अकाउंट नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे आता पुढारीही काही वक्तव्य किंवा कृती करताना चार वेळा विचार करत आहेत, अशी चर्चा आहे.
या अकाउंटमागे कोण आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. संबंधित व्यक्ती पुरुष आहे की महिला? राजकीय पार्श्वभूमी आहे का? याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. मात्र, सामान्यांच्या मनातील विचार मांडणाऱ्या या अकाउंटमुळे चाळीसगावकर हैराण झाले आहेत.