जळगावमध्ये मोठा राजकीय भूकंप; शरद पवार गटाला जबर धक्का, अनेक मातब्बर नेते अजित पवार गटात
देवकर अप्पा, सतीश अण्णा या दिग्गजांसह अनेक नेते पदाधिकारी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगावमध्ये मोठा राजकीय भूकंप; शरद पवार गटाला जबर धक्का, अनेक मातब्बर नेते अजित पवार गटात
देवकर अप्पा, सतीश अण्णा या दिग्गजांसह अनेक नेते पदाधिकारी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई | प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला असून, पक्षातील अनेक मातब्बर नेते आणि पाच माजी आमदारांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत भव्य स्वरूपात पार पडला. यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.
अलीकडील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जिल्ह्यात एकही जागा मिळाली नाही. यामुळे पक्षात नैराश्याचं वातावरण निर्माण झालं होतं. याच दरम्यान जिल्ह्याच्या पातळीवर अंतर्गत संघर्ष वाढला आणि अनेक नेत्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला.
आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री डॉ. सतीशअण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास गोरख पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप सोनवणे, अमळनेर बाजार समितीच्या माजी सभापती तिलोत्तमा पाटील, तसेच शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी अधिकृतरित्या अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यांचे स्वागत केले.
या प्रवेश सोहळ्याला आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशानंतर जोरदार घोषणाबाजी करत वातावरणात उत्साह निर्माण झाला.
या राजकीय घडामोडींमुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या त्यांच्या गटात मोजकेच नेते उरले असून, माजी मंत्री आ. एकनाथ खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार ईश्वर जैन, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि काही माजी आमदार व जिल्हा पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता बहुतेक नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्वभूमी असतानाच घडलेल्या या राजकीय घडामोडींमुळे शरद पवार गटाला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, असे जाणकारांचे मत आहे.