
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रियेला सुरुवात झाली असून यंदाच्या बदल्या न भूतो ना भविष्यती अशा असण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षकांनी आणि बदली समितीने काही निकष तयार केले असून त्यानुसार बदली होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव आणि भुसावळ शहरात अनेक वर्षापासून शहर, तालुका, बाजारपेठ, ग्रामीण, वाहतूक अशी सर्कस करणाऱ्यांची उचलबांगडी होणार आहे. तसेच क्रीम आणि सोयीच्या दृष्टीने विनंती बदलीची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांचा यंदा नो चान्स असल्याची माहिती आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून यंदा पोलीस प्रशासनाने बदली प्रक्रिया राबवताना काही निकष तयार केले आहे. एकाच उपविभागात १० वर्ष सेवा केलेले, एकाच पोलीस ठाण्यात ५ वर्ष सेवा बजावलेले, प्रथमच पोलीस ठाणे हवे असणारे अशांची बदली केली जाणार आहे. तसेच आई, वडील, मुलांच्या तब्येतीचे कारण देत बदली मागणारे आणि स्थगितीची अपेक्षा ठेवणाऱ्यांची बदली होणार नसल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यात जळगाव जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा डागाळत असल्याचे लक्षात घेऊन यंदा मोठे फेरबदल होणार असल्याचे म्हटले जात आहे.
चाळीसगाव, भुसावळ प्रकाशझोतात
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि चाळीसगाव तालुका सध्या चर्चेत आहे. चाळीसगाव येथील पोलिसांचे खंडणी प्रकरण तर भुसावळ येथील व्हायरल व्हिडीओने मोठी खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव आणि मुक्ताईनगर येथील अनेक कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. भुसावळ आणि चाळीसगाव येथील बरेच कर्मचारी अनेक वर्षापासून त्याच परिसरात नेमणुकीला आहेत. शहर, तालुका, ग्रामीण, बाजारपेठ, वाहतूक शाखा अशी गोल सर्कस फिरवून कर्मचारी आपली बदली टाळत होते. पोलीस अधिक्षकांच्या हा प्रकार लक्षात आला असून यंदा अशा जवळपास २०० कर्मचाऱ्यांची उचलबांगडी होणार आहे.
विनंतीमध्ये विनंती हवी महत्वकांक्षा नको
जळगाव जिल्ह्यातील जवळपास ४०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीसाठी अर्ज केला आहे. विनंती बदलीसाठी अर्ज करताना खरोखर काही अडचण असेल, कौटुंबिक किंवा मोठी वैद्यकीय अडचण असल्यास अशा कर्मचाऱ्यांची बदली शक्य आहे. अनेक कर्मचारी विनंती बदलीसाठी अर्ज करताना काहीतरी स्वार्थ ठेवून बदली मागत असतात किंवा त्यांच्या काही महत्वाकांक्षा असतात. महत्वाकांक्षा ठेवून बदलीसाठी अर्ज सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विनंतीचा विचार केला जाणार नसल्याची माहिती आहे.