Other

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
जळगाव प्रतिनिधी अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. विद्यार्थ्यांना गुरुचे जीवनातील महत्त्व, भारतीय गुरु-परंपरा तसेच महान विभूतींच्या जीवनकार्याची आणि त्यांच्या प्रेरणादायी शिकवणीची ओळख करून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या पावन प्रसंगी विद्यालयाचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, अंबिका जैन यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना गुरुजनांप्रती सदैव आदर आणि कृतज्ञतेची भावना जपण्यास तसेच महान विभूतींच्या शिकवणीचा आपल्या जीवनात अंगीकार करण्यास प्रेरित केले.
गुरुपौर्णिमेच्या पावन प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसाठी सुंदर पुष्पे आणून त्यांचे पूजन केले आणि शिक्षकांचे आशीर्वाद घेतले. विद्यार्थ्यांनी गुरुची महती आणि भक्तिभाव व्यक्त करणारी सुंदर भजने व भक्तिगीते सादर केली. त्यांच्या मधुर गायनामुळे विद्यालयाचे वातावरण भक्तिमय झाले. कार्यक्रमात शिक्षकांनी भारताच्या गुरु-परंपरेतील प्रेरणादायी महापुरुषांच्या जीवनावर विशेष सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना भगवान महावीर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, आचार्य चाणक्य, आर्यभट्ट, गुरु नानकदेव, लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि भगवान बुद्ध यांच्या जीवनकार्याची व शिकवणीची माहिती देण्यात आली. या महान विभूतींच्या जीवनातून विद्यार्थ्यांना अहिंसा, आत्मसंयम, करुणा, मानवता, समानता, आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन, परिश्रम, दूरदृष्टी, सेवा आणि लोककल्याण यांसारख्या जीवनमूल्यांची प्रेरणा मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांनी श्रद्धापूर्वक माता सरस्वती, महर्षी वेदव्यास तसेच अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पुष्प देऊन आशीर्वाद घेतले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना हा संदेश देण्यात आला की, गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. गुरुचे ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. गुरुपौर्णिमेचा हा उत्सव विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सण न राहता गुरुंबद्दल आदर, कृतज्ञता आणि ज्ञानाबद्दल समर्पणाची भावना जागविणारा प्रेरणादायी अनुभव ठरला. भारतीय ज्ञानपरंपरेतील महान गुरु आणि विभूतींच्या विचारांशी विद्यार्थ्यांना जोडणारा हा कार्यक्रम अत्यंत अर्थपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button