हातगाव येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, पतीची आत्महत्या

हातगाव येथे चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, पतीची आत्महत्या
मृत्यूपूर्वी भावाला फोन करून दिली माहिती; पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल
चाळीसगाव l प्रतिनिधी : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा दोरीने आवळून खून केला, आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे सोमवारी (दि. २ जून) सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. या दुहेरी मृत्यूने गावात खळबळ उडाली आहे.
मयतांची नावे विजय सुकदेव चव्हाणके (वय ४५) व वर्षा विजय चव्हाणके (वय ४०) अशी असून, विजय हा आई व मुलांसह हातगाव शिवारातील शेतात वास्तव्यास होता. काही दिवसांपासून दाम्पत्यात मतभेद व सतत वाद होत असल्याची माहिती मिळाली आहे.
सोमवारी सकाळी ११:२५ वाजता विजय याने आपल्या मोठ्या भावाला, अशोक चव्हाणके यांना फोन करून आपण पत्नी वर्षाचा खून केला असून, स्वतःही टोकाचे पाऊल उचलणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर अशोक चव्हाणके यांनी तातडीने कुटुंबीयांसह शेतात धाव घेतली.
शेतात पोहोचल्यावर विजय आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर, वर्षा ही शेतातील गुरांच्या चाऱ्यात मृतावस्थेत सापडली. तिच्या गळ्याभोवती सुती दोरी आढळून आली.
याप्रकरणी अशोक चव्हाणके यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून विजय चव्हाणके यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.