
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । एक काळ होता… उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की गल्लीभर खेळांचा गोंगाट असे. पाय धुळीने माखलेली मुले, घामाच्या धारांतही खेळण्यात रंगलेली, हरली तरी पुन्हा उत्साहाने उभी राहणारी. पण आज ती गल्लीतली मैदानं शांत आहेत… आणि घरात, बंद दरवाज्याआड बसलेली तीच मुले मोबाईलच्या स्क्रीनवर ‘चिकाटीने’ युद्ध लढत आहेत. फ्री फायर, पब जी, बिजी 3, क्लॅश ऑफ क्लॅन्स… असे एक गेम संपला की दुसरं सुरु. आणि असं करता करता सुट्टीचा दिवस सरतो.
हे फक्त एक खेळ नाही, हे व्यसन बनतंय
डोळे सतत स्क्रीनकडे, कानात गेमचे आवाज, हात सतत टच स्क्रीनवर… आणि मन? ते या आभासी जगात हरवलेलं आहे. बाल मानसोपचार तज्ज्ञ सांगतात, “मोबाईल गेम्सचा अतिवापर केल्याने लहान मुलांमध्ये चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, समाजापासून दूर जाणं आणि भावनिक अस्थिरता वाढू लागते. अनेक पालक त्यांच्या मुलांबाबत चिंतेत आहेत, पण उपाय माहित नाहीत.”
मैदानी खेळांचा अभाव, घरात बसून आराम
पूर्वीच्या पिढ्यांमध्ये मैदानी खेळांचा भरपूर उपयोग होत असे. क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, लगोरी यांसारखे खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते, तर शारीरिक व्यायाम व सामाजिक कौशल्यांचा विकास करणारे साधन होते. परंतु आजची मुले घरातच राहून मोबाईलवर खेळण्यात वेळ घालवतात. त्यामुळे मैदानी खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
आजची मुलं मैदानात हरवत नाहीत
शारीरिक हालचाली कमी झाल्याने लहान वयातच स्थूलपणा, डोळ्यांचे विकार, पाठ-मानदुखी यांसारखे त्रास दिसू लागले आहेत. एकीकडे शरीर थकलेलं, तर दुसरीकडे मन अस्वस्थ. मैदानी खेळ केवळ खेळ नसतात. ते नेतृत्व, सहकार्य, हार-जीत स्वीकारण्याची तयारी शिकवतात. जळगाव जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षक म्हणाले, “दिवसेंदिवस मुलं शाळेत उदास दिसू लागली आहेत. पूर्वी खेळायला उत्साहाने धावत असत, आता एकमेकांशी बोलणंही कमी झालंय.”
पालकांनी हात धरावा, मोबाईल नव्हे..
मोबाईल दिलं की मूल शांत होतं, ही सोय आता मोठं संकट बनतेय. पण पालकांनीच हे साखळदंड तोडायला हवेत.
• सुट्टीच्या दिवसात मुलांसोबत खेळा, त्यांच्याशी बोला.
•.‘नो मोबाईल टाइम’ ठरवा. जेव्हा संपूर्ण कुटुंब मोबाईलपासून दूर राहील.
• वाचन, चित्रकला, संगीत, स्वयंपाक अशा घरगुती उपक्रमात मुलांना सामावून घ्या.
• आठवड्यातून एकदा तरी कुटुंबासह मैदानात, निसर्गात वेळ घालवा.
विद्यार्थी झाले उद्धट, शिक्षक झाले परेशान
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, “दररोज पाचवी ते आठवीच्या वर्गातील जवळपास ७०% मुले शाळा सुटताच थेट मोबाईल गेम्स खेळण्यात व्यस्त होतात. परिणामी गृहपाठ पूर्ण न होणे, शिक्षकांशी उद्धटपणे वागणे आणि वर्गात दुर्लक्ष अशी स्थिती निर्माण झाली आहे.”
पालकांना आमची विनंती..
प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक जग असतं, कल्पनांचे, स्वप्नांचे… त्याला मोबाईलच्या चौकटीत बंद करून ठेवू नका. मुलांना बोट धरून मैदानापर्यंत घेऊन जा… माती लागेल, पाय दुखतील, पण त्यातूनच ते मोठे होतील. नवीन धडा शिकतील. आम्ही लहान होतो तेव्हा पडलो, लागले तर ना पालक बोलायचे ना आम्ही रडायचो. उलट रक्त आले की लवकर शिकतो असे सर्व म्हणायचे. आज मुलांच्या हातात मोबाईल देत आहात, उद्या तेच हात तुमच्याकडे उपचारासाठी पुढे येतील? विचार करा.